| अहिल्यानगर | प्रतिनिधी |
अहिल्यानगर शहरातील पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर सध्या गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. काही पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असून, खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केला आहे. तसेच, शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गडद सावट पसरले असून, नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे दिसून येत आहे, असेदेखील खासदार लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी खोट्या गुह्याची नोंद करण्यात आली होती. आता या मालिकेत आणखी एक प्रकरण जोडले गेले असून, शिवसेना उपनेते, दिवंगत अनिलभय्या राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड यांच्यावरही कोणतीही चौकशी न करता थेट ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण अत्यंत संशयास्पद असून, तक्रारदाराचा सत्ताधारी पक्षाच्या राजकीय पाठबळ असलेल्या गटाशी संबंध असल्याचे खासदार लंके यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, सुभाष चौक येथे जाणीवपूर्वक गोंधळ घालणाऱ्या तक्रारदार व्यक्तीविरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस त्यावेळी घटनास्थळी उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी पोलीस प्रशासनाच्या पक्षपाती आणि निवडक कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत गृह विभागाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. विरोधी पक्षांतील कार्यकर्त्यांविरोधात खोटे गुन्हे नोंदवले जात आहेत, तर प्रत्यक्ष गोंधळ घालणाऱ्यांना अभय दिले जात आहे. ही बाब केवळ अन्यायकारक नसून, लोकशाही मूल्यांवर आघात करणारी आहे, असे लंके यांनी म्हटले आहे.
नगर शहरात घडणाऱ्या या घटनांमुळे पोलीस यंत्रणेवरील विश्वासार्हता डळमळीत झाली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याच कर्तव्य पोलीस दलावर आहे, त्याच संस्थेवर राजकीय दबावाखाली अन्यायकारक पद्धतीने कारवाई होत असल्याचा आरोप सार्वजनिकरित्या होत आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. दरम्यान, या दोन्ही प्रकरणांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, संपूर्ण तपशीलासह अहवाल गृह विभागास सादर करण्यात यावा, खोटे गुन्हे नोंदवणाऱया संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार लंके यांनी केली आहे.






