एक हजारहून अधिक पोलिसांचा असणार बंदोबस्त
| अलिबाग | प्रमोद जाधव |
वर्षपूर्तीनिमित्त रायगड जिल्ह्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यामध्ये एक हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. ठिकठिकाणी नाका बंदी करून गैरप्रकार व अवैद्य धंद्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. रात्री बारावाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वाजवण्यास मुदत देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, किहीम, नागाव, वरसोली, आक्षी, मांडवा, बोर्ली, रेवदंडा, मुरुड, काशीद, श्रीवर्धन, म्हसळा अशा विविध समुद्रकिनारी असलेल्या हॉटेल, कॉटेजेस तसेच कर्जत परिसरातील फार्महाऊस आणि माथेरानमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. मुंबई, पुणे येथील पर्यटकांनी यंदादेखील रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला पसंती दर्शविली आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपासून पर्यटकांची वर्दळ अलिबागसह अन्य समुद्रकिनारी दिसून आली आहे. जिल्ह्यात सुमारे तीन लाख पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे.
स्थानिकांसह पर्यटकांना नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात व आनंदात साजरे करता यावे, यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 109 पोलीस अधिकारी, 874 पोलीस कर्मचारी 87 वाहतूक पोलीस व दोन आरसीपी दल तैनात असणार आहेत.
38 ठिकाणी नाकाबंदी नववर्षाचे स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीत 38 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. तसेच पोलिसांच्या नेहमीच्या 117 ठिकाणी तपासणी आणि 112 ठिकाणी पोलीसांची गस्त राहणार आहे.
गुन्हे अन्वेषण शाखेची राहणार नजर रायगड जिल्ह्यात अमली पदार्थाने शिरकाव केला आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. त्यातील काही पर्यटकांकडून अमली पदार्थाचा वापर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जिल्ह्यात येणारी वाहने, फार्म हाऊस, हॉटेल्स, लॉज आणि पार्ट्यांची ठिकाणे, समुद्रकिनारे येथे साध्या वेशातील पोलीस पथके व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकामार्फत नजर ठेवली जाणार आहे.
महिलांची छेडछाड रोखण्यासाठी महिला पोलीस पथक
31 डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देताना प्रचंड गर्दी होणार आहे. या गर्दीचा फायदा घेत काहींकडून महिलांची छेडछाड काढण्याचा धोका आहे. त्यानिमित्ताने पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. महिला पोलीस अंमलदार साध्या गणवेशात महिलांच्या सुरक्षेसाठी राहणार आहेत.
दारु पिऊन धिंगाणा करणे पडणार महागात
वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस अंमलदार नियुक्त केले आहेत. मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांना चाप लावण्यासाठी श्वास विश्लेषक यंत्राचा वापर केला जाणार आहे. त्यामार्फत वाहन चालकांची तपासणी केली जाणार आहे. दारु पिऊन धिंगाणा घालणे, दारुच्या नशेत वाहन चालविणे, गैरवर्तन करणाऱ्यावर लक्ष ठेवण्यात येणार असून त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच, वाहतूक कोंडी रोखण्यासाठी जिल्ह्यातील दहा महत्वाच्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणी ड्रोन कॅमेराची मदत घेतली जाणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील नागरिक आणि जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. संशयित व्यक्तींवर नजर ठेवणे, काही आक्षेपार्ह वस्तू किंंवा प्रकार आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणे अथवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी. नियमांचे पालन करून वर्षपूर्ती साजरी करावी, नागरिकांनीदेखील पोलिसांना सहकार्य करावे, दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
सोमनाथ घार्गे, अधीक्षक, रायगड पोलीस