। नेरळ । प्रतिनिधी |
नेरळ गावात 14 मे रोजीच्या वादळात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका कार्यालयावर तसेच एका घराच्या छप्परवर झाड पडल्याने घराचे नुकसान झाले होते. त्यानंतर महावितरण विभागाला कळविण्यात आल्यानंतर तत्काळ कोणीही कर्मचारी त्या ठिकाणी पोहचला नाही. स्थानिक रहिवाशी पप्पू जाधव आणि कार्यकर्त्यांनी स्वतः खर्चाने झाडे तोडण्यास सुरुवात केली. त्यासाठी नेरळ गावातील वीज तब्बल दिवसभर बंद ठेवावी लागली. मात्र, कोसळलेली झाडे पुर्णपणे तोडण्यात आली नाही. शेवटी वीज पुरवठा सुरू करताना महावितरण कर्मचार्यांनी अंधाराचे कारण देत उद्या येऊन अर्धवट राहिलेली झाडे तोडून टाकू, असे आश्वासन दिले होते. परंतु, आठ दिवस लोटले तरी पुन्हा ते त्या ठिकाणी फिरकलेच नाहीत. दरम्यान, महावितरण विभागाकडून मागील 25 दिवसात दोनवेळा झाडे कापण्यासाठी भारनियमन करण्यात आले होते. मात्र, नेरळ गावातील पडलेले झाड तोडायला कोणताही कर्मचारी अद्यापही पोहचला नाही. यामधून महावितरणचा भोंगळ कारभार दिसण्यात येत आहे.