श्रीवर्धनमध्ये विजेचा खेळखंडोबा

दुरुस्तीसाठी आठवड्यातून संपूर्ण दिवसभर पुरवठा खंडित

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यासह श्रीवर्धन तालुक्यात मुसळधार पाऊस रविवारी रात्रीपासून सुरू होता. परंतु, पाऊस सुरू झाल्यानंतर नेहमीच महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येतो, याची अनेक कारणे असतात. काही वेळेला वीजा चमकत असतील किंवा वारा सुटला असेल तर महावितरण कंपनी वीजपुरवठा खंडित करते. तर अनेक वेळा पावसामुळे वीज वितरणात बिघाड होतात. पावसाळा सुरू होण्याअगोदर महावितरणाकडून अनेक वेळा पावसाळ्यापूर्वीची देखभाल व दुरुस्ती यासाठी आठवड्यातून दोन दोन वेळा संपूर्ण दिवसभर वीज पुरवठा खंडित ठेवण्यात येतो.

यावेळी खरोखर देखभाल व दुरुस्ती केली जाते, की छुप्या पद्धतीने भारनियमन केले जाते. हा प्रश्न वीज ग्राहकांना पडला आहे. कारण अनेक वेळा देखभाल व दुरुस्तीची कामे करून सुद्धा अनेक वेळा वीज वाहकतारांच्या आजूबाजूच्या झाडांच्या फांद्या तोडून सुद्धा, थोडासा पाऊस पडला तरी वीज पुरवठा खंडित होतो.
काही वर्षांपूर्वी पाभरे येथून श्रीवर्धनकडे येणारी वीज वाहिनी हॉटेल रवी प्रभा या नेरूळ गावाजवळ असलेल्या ठिकाणापर्यंत भूमिगत टाकण्यात आली होती. मात्र, म्हसळा श्रीवर्धन मार्गाचे रुंदीकरणाचे काम करताना सदर भूमिगत वीज वाहिनी खराब झाली आहे.

त्यामुळे श्रीवर्धनवासीयांना अंधाराचा सामना करावा लागला होता. आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सण येणार आहेत. यावेळी तरी वीज पुरवठा व्यवस्थित सुरू राहावा, याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. महावितरणचे कर्मचारी जर का कमी पडत असतील तर ठेकेदारी तत्त्वावर घेतलेल्या कामगारांकडून दुरुस्तीची कामे तातडीने करून घ्यावी.

विद्युत वाहिन्याचे मार्ग बदला
पाभरे येथून श्रीवर्धनकडे येणाऱ्या विद्युत वाहिन्या या काही ठिकाणी खाडीमार्गातून आलेल्या आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी खाडीपात्रापासून रस्त्याच्यामार्गे जर का वीज वाहिन्या टाकल्या तर दुरुस्तीची कामे लवकरात लवकर करता येतील. श्रीवर्धन वासियांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
Exit mobile version