। खोपोली । प्रतिनिधी ।
ताकई विठ्ठलवाडीत खोपोली नगरपरिषद आणि नागरी सुविधा केंद्र खालापूर यांच्या पुढाकाराने आदिवासी बांधवांसाठी पंतप्रधान श्रमयोगी मानधन निवृत्तीवेतन योजना सुरू केली आहे. सोमवार दि.8 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी बांधवांना, महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत नोंदणी केली आहे. केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणार्या मजुरांसाठी वयाच्या 60 वर्षांनंतर उदरनिर्वाह करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
यासाठी खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे आणि नागरी सुविधा केंद्र खालापूर प्रमुख अश्विनी राजे यांच्या पुढाकाराने ही योजना नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी सामाजिक सुरक्षा अधिकारी के.के.जर्नाधन्न,सामाजिक सुरक्षा कर्मचारी राज्य विमा निगम सहाय्यक नितीन जाधव,खोपोली नगरपरिषद अभियान व्यवस्थापक पंकज खोत,समुदाय संघटक सविता जाधव,जनविकास संस्था खोपोली रामदास करकरे,सी.एस.सी.ई लि.जिल्हा समन्वय सिध्देश राजे उपस्थित होते.
या योजनेतून मजूर, वीटभट्टी, पादत्राणे बनवणारे कामगार, कचरा वेचक, घरगुती काम करणारे, कपडे धुणारे, रिक्षाचालक, जमीन नसलेले मजूर, विडी कामगार आणि रोजंदारी कामगार यांना पेन्शन देण्यात येणार आहे. तसेच मासिक 15,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मजुरांना या योजनेत समाविष्ट केले जाईल.