| मुंबई | प्रतिनिधी |
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत आम्ही युतीत असलो आणि आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणूक जर ठाण्यातून लढवली तर मी त्यांच्या प्रचाराला जाणार आहे,असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही वरळीतून लढा नाही तर मी ठाण्यातून निवडणूक लढवतो असे आव्हान दिले. त्यावर प्रकाश आंबेडकर बोलत होते. ठाकरे यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरी मी युतीधर्म पाळणार. मी पॉलिटिकल क्लिअर आहे. काँग्रेस आणि शरद पवारांचा अदानींसंदर्भात नरोबा, कुंजोबा सुरु आहे तसे आमचे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी देखील माहिती दिली. 1 सप्टेंबर रोजी वंचितनं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी पत्र लिहिलं होतं तसेच ईमेल देखील केला होता. पत्रात आम्ही आम्हाला इंडिया आघाडीत सहभागी व्हायचं आहे, असे म्हटले होते. तसेच ज्या अटी असतील त्यासोबतच आम्ही बोलणी करण्यास तयार आहे . मात्र आजपर्यंत काँग्रेसकडून पत्राला कोणतंही उत्तर आलं नाही, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
2024 च्या निवडणुकीबाबत काँग्रेसमध्ये स्पष्टता नाही
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोदींना पुन्हा पंतप्रधान व्हायचं असेल तर 272 खासदार निवडून आणावे लागतील. मात्र 272 खासदार निवडून आले नाही तर मोदी पंतप्रधान होणार नाही. सरकार कोणाचं असेल हे सांगता येणार नाही. कारण त्यावेळच्या पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावर ते अवलंबून असणार आहे. इंडियात किंवा मविआत फॉर्म्युल्याची चर्चा होत नाही, त्यामुळे दाल मे कुछ काला है असं वाटतं. पुढच्या पाच वर्षाचे नियोजन आरएसएस आणि भाजपचे सुरु झालेत. ते देशासाठी घातक आहेत. आगामी 2024 च्या निवडणुकीत जी स्पष्टता पाहिजे ती काँग्रेसमध्ये दिसत नाही. मोदी, आरएसएसविरोधात काय धोरण आहे ते इंडियानं ठरवलेले नाही अशी परिस्थिती आहे, असेही ते म्हणाले.