। सुधागड -पाली । वार्ताहर ।
अवकाळी पावसामुळे उत्पादन घट झाली असल्याने जिल्ह्यात कडधान्याचे भाव वधारले आहेत. मागील वर्षी 90 ते 100 रुपये किलो मिळणारे वाल यंदा 130 रुपये किलोने मिळत आहेत. निडी येथील गावठी वाल देखील किलोमागे 30 ते 40 रुपयांनी वाढले आहेत.
जिल्ह्यात कडधान्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास चार हजार 381 हेक्टरवर वालाची लागवड केली जाते. त्यानंतर मुग, मटकी, चवळी, तूर आदी कडधान्याची लागवड केली जाते. ग्राहकांची गोड व कडवे वाल, लहान चवळी आणि निडीच्या वालांना अधिक पसंती आहे. पावसाळ्यासाठी खेड्या-पाड्यासह शहरातील अनेक जण या कडधान्याची खरेदी करतात. त्यात गावठी कडधान्यांना अधिक पसंती आणि मागणी असते. बाजारात किरकोळ व घाऊक दरात कडधान्य उपलब्ध आहेत.
वालाने खाल्ला भाव
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात कडधान्य पिकांचे खूप नुकसान झाले. परिणामी यंदा वालाचे उत्पादन कमी झाल्याने भाव वधारले आहेत.
निडीच्या वालांना शहरी ग्राहकांची मागणी
निडी गावचे रुचकर, स्वादिष्ट व मोठ्या वालाच्या शेंगा प्रसिद्ध आहेत. याच्या टपोर्या वालांना शहरातील ग्राहकांची अधिक पसंती असते. मात्र स्थानिक लोक छोट्या गावठी वालांना पसंती देतात. असे विक्रेते भद्रेश शहा यांनी माहिती देताना सांगितले.
सध्या बाजारात ग्राहकांची कडधान्य खरेदीसाठी लगबग सुरु आहे. गावठी कडधान्यांना अधिक मागणी असते. अवकाळी पावसामुळे उत्पादन घातल्याने यावर्षी कडधान्यांचे भाव मात्र वाढले आहेत – भद्रेश शहा, घाऊक व किरकोळ कडधान्य विक्रेते, पाली
दरवर्षी पावसाळ्याच्या आधी गावठी कडधान्य विकत घेतो. यंदा भाव जास्त आहेत. शहरातील नातेवाईकांना आवर्जून भेट म्हणून कडधान्ये पाठवितो.
लता माळी, गृहिणी, पाली






