राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुणे, मुंबई शहर मानकरी


|जळगांव | प्रतिनिधी|
पुण्याने महिलांत , तर मुंबई शहरने पुरुषांत 21व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. दोन्ही संघांनी या वर्षात हॅट्रिक साजरी केली. अहमदनगर येथे झालेली 70वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी, बारामती-पुणे येथे झालेली मिनी ऑलम्पिक आणि आता छत्रपती शिवाजी महाराज चषक हे तिसरे जेतेपद.

जळगांव येथील सागर पार्क मैदानातील मॅट वर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई उपनगरचा प्रतिकार 37-28 असा मोडून काढत रोख दीड लाख रुपये व छत्रपती शिवाजी महाराज चषक आपल्या नावे केला. उपविजेत्या उपनगरला चषक व रोख एक लाखावर वर समाधान मानावे लागले. पहिल्या डावात लोण देत 20-16 अशी आघाडी घेणार्‍या पुण्याने दुसर्‍या डावात आणखी एक लोण देत 9गुणांच्या फरकाने आपला विजय साकारला. निकिता पडवळ, आम्रपाली गलांडे यांच्या संयमी चढाया, त्याला साक्षी गावडे, पूजा शेलार यांनी उत्कृष्ट पकडी करीत दिलेली मोलाची साथ यामुळे पुण्याला हे शक्य झाले. उपनगरच्या हरजित कौर संधू हिला अन्य खेळाडूंची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. त्यांच्या शुभदा खोत, प्रणाली नागदेवता यांचा या सामन्यात प्रभाव पडला नाही.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई शहरने अहमदनगरचे आव्हान 28-25 असे परतवून लावत छत्रपती शिवाजी महाराज चषक व रोख दीड लाख रुपये आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या अहमदनगरला चषक व रोख एक लाख वर समाधान मानावे लागले. मुंबईने नाणेफेक जिंकत मैदानाची निवड केली. नगरने आक्रमक सुरुवात करीत पहिल्या काही मिनिटात आघाडी घेतली. पण त्याने विचलित न होता मुंबईने पहिल्या सत्रातच 2लोण नोंदवित 21-08 अशी भक्कम आघाडी घेतली. दुसर्‍या सत्रात मात्र सावध खेळ करण्याच्या नादात बेसावध रहाणार्‍या मुंबईवर नगरने एक लोण देत आपली आघाडी कमी केली. पुन्हा काही गुण घेत आघाडी एका गुणापर्यंत खाली आणली. नंतर मात्र अतिशय संयमाने खेळ करीत 3 गुणांनी मुंबईने विजेतेपदाचा चषक उंचावला. प्रणय राणे, अक्षय सोनी, सुशांत साईल यांच्या चतुरस्त्र चढाया, तर संकेत सावंत, हर्ष लाड यांच्या भक्कम पकडी या मुळे मुंबईने विजय साकारला. शिवम पठारे, तुळशीदास वायकर यांनी अहमदनगरकडून शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली. पण संघाला विजयी करण्यात ते अपयशी ठरले.

Exit mobile version