। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात अवकाळी रब्बी पिकांची नासाडी झाली असून या रब्बी पिकांचे नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी चिरनेरचे कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील यांनी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब आंधारे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात दरवर्षी वाल, चवळी, मूग, हरभरा अशी कडधान्ये शेतकरी पेरत असतात. या कडधान्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळत असते. पण या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिके धोक्यात आली असून या रब्बी पिकांची संपूर्ण नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रब्बी पिकांमुळे शेतकर्यांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळत असते. येथील शेतकर्यांना भात आणि कडधान्ये शिवाय आणखी कोणतेही पीक घेता येत नसल्यामुळे याच पिकावर येथील शेतकरी अवलंबून आहे. निसर्गाची वक्रदृष्टी असल्यामुळे गेले बरीच वर्ष शेतकर्यांना भाताचे व कडधान्याचे पीक नीट घेता येत आले नाही त्यामुळे शेतकर्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.