राहुल गांधीं आसाम, मणिपूर दौर्‍यावर

| आसाम | वृत्तसंस्था |

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांमवारी (दि.8) आसाम आणि मणिपूरचा दौरा केला. त्यांनी दौर्‍याची सुरुवात सिलचर येथून केली. तेथे पूरग्रस्तांची भेट घेतली आणि थलाई येथील मदत शिबिरांची पाहणी केली. आसाम दौर्‍यावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी राहुल गांधींना निवेदन सादर करुन आसाममधील बारमाही पुराचा मुद्दा संसदेत मांडण्याची विनंती केली.

आसामचा दौरा झाल्यानंतर राहुल गांधींनी मणिपूर येथील जिरीबाम उच्च माध्यमिक विद्यालयातील मदत शिबिराला भेट दिली. यानंतर त्यांनी इंफाळच्या मदत छावण्यांमध्येही पाहणी केली. सायंकाळी त्यांनी मणिपूरच्या राज्यपालांची भेट घेेतली. याशिवाय पक्षाच्या नेत्यांचीही भेट घेत लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. लोकसभा निवडणुकीत मणिपूरच्या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. दरम्यान, राहुल गांधी मणिपूरला पोहोचण्यापूर्वी सोमवारी पहाटे 3.30 वाजता जिरीबाममध्ये जोरदार गोळीबार झाला. सुमारे 3.30 तास हा गोळीबार सुरू होता. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, आसाममध्ये पुरामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. 29 जिल्ह्यांमध्ये एकूण 23 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.

Exit mobile version