। बीड । प्रतिनिधी ।
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने मोठी कारवाई केली आहे. 12 कोटींचा जीएसटी चुकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे कारखान्याची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार असतानाही या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, हा कारखाना गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून त्याला कुलूप लावलं आहे. कारखाना अत्यंत आर्थिक अडचणीत आहे. 2011 पासून कारखान्यातील सातत्याने झालेलं कमी उत्पादन, 2013-15 अशा तीन वर्षातील प्रचंड दुष्काळ, उसाचा अभाव आणि अधिकचं कर्ज या कारणांमुळे कारखाना अडचणीत आहे.नेमका कशासाठी छापा टाकला याबाबत माहिती नसल्याचेही त्यांनी सुचित केले.