। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनाची तिसरी लाट म्हणजेच ओमायक्रॉन नावाचे वादळ शमविण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. परंतु ओमायक्रॉन वेशीवरच रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यातील जनतेने कोव्हीड योद्धा म्हणून पुढे यावे. कोरोना लसीकरणासाठी आपल्या संपर्कातील नागरिकांना प्रोत्साहित करावे आणि कोरोना बाधित झाल्यास आपल्या संपर्कातील नागरिकांची यादी प्रशासनाला देऊन सहकार्य करावे असे आवाहन रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले.
कोरोना आपत्तीच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत रायगडच्या जनतेने धैर्य दाखविले. लॉकडाऊनच्या काळात हवालदिल झालेल्या जनतेला अनलॉकमुळे जगण्याची उमेद मिळाली. असे असताना कोव्हीडचा ओमायक्रॉन या झपाट्याने पसरणार्या नवीन व्हॅरियंटने रायगडच्या जनतेची पुन्हा एकदा झोप उडविली आहे. कॅव्हिडची संभाव्य तिसरी लाट, नवा व्हेरिएन्ट ओमिक्रोन , रायगड जिल्ह्यातील झालेले लसीकरण , जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांची तयारी याचा आढावा पत्रकार परिषदेदरम्यान जिल्हाधिकारी डॉ, महेंद्र कल्याणकर यांनी पत्रकार परिषदेत मांडला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसीलदार विशाल दौंडकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी उपस्थित होते.
रायगड जिल्हा कोरोना सक्रिय रुग्णांच्या तुलनेत राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे. दैनंदिन आरटीपीसीआर आणि अँटीजेन टेस्टची संख्या 5 हजारहून अधिक आहे. अद्यापही लोकसंख्येच्या तुलनेत 1 लाख 98 हजार नागरिकांनी कोरोना लसीकरणाचा डोस घेतलेला नाही. यामुळे संभाव्य तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेता कोरोना टेस्ट वाढविण्याचे आदेश आरोग्य यंत्रणांना दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना तपासणी आणि लसीकरण यासाठी मॉकड्रील करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिल्याचे डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले. कोव्हिडचा नवा व्हेरियंट ओमिक्रोन यावर कोणत्याही लसीचा परिणाम होत नाही. अशी टास्क फोर्समधील तज्ज्ञांची माहिती आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात असणार्या रुग्णालयांमध्ये बेडची उपलब्धता करण्यात आली आहे.या बेडवरील कोरोना रुग्णांना अपेक्षित असणार्या ऑक्सिजनची उपलब्धता रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे आहे. असे असलेतरी कोरोनाबाबत काळजी घेण्याची जनजागृती करण्याची वेळ आता संपली आहे. जनतेनेच मास्क वापरणे , सामाजिक अंतर ठेवणे, कोरोना लसीकरण करून घेणे याची अंमलबजावणी करावी असे आवाहन डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले.