महाडमध्ये वादळी पाऊस; मुरुडचा पारा चढला
। महाड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्याला अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे हवामानात कलामीचा बदल घडून आला आहे. सतत दोन दिवस होणार्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात शनिवारी ढगाळ वातावरण दिसून आले. तसेच पडून गेलेल्या पावसामुळे वातावरण चांगलेच तापले होते. वाढलेल्या उष्म्याने देखील नागरिक हैराण झाले होते. रायगडात शनिवार, रविवारी सुट्टी असल्याने पर्यटकांची गर्दी असते परंतु अवकाळी पावसामुळे तापमानात अचानक वाढ झाल्याने पर्यटकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत होते.
शिरगाव येथील घरकुलाची भिंत कोसळली
महाड तालुक्यात गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल होऊ अवकाळी पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातून बदललेल्या तापमानामुळे शुक्रवारी मध्यरात्री अचानक तालुक्यातील काही भागात पाऊस तर काही भागात वादळी वार्याने नुकसान केले. या वादळी वार्यामुळे शहराजवळ असलेल्या शिरगाव आदिवासीवाडी येथे एका घराची भिंत कोसळली असून घराचे नुकसान झाले.
महाड तालुक्यात गेली काही दिवस सातत्याने बदलणार्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील आणि शहरातील काही भागात पाऊस पडला. बिरवाडी विभाग तसेच किल्ले रायगड परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला. या पावसामुळे आणि वादळी वार्याने अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या सार्वजनिक, सांस्कृतिक आणि लग्न सोहळे आटोपते घ्यावे लागले. पावसामुळे आंबा, करवंद, आदी रानटी फळे धोक्यात आली आहेत. पडलेल्या पावसामुळे दुसर्या दिवशी वातवरण देखील चांगलेच तापले होते. वाढलेल्या उष्म्याने देखील नागरिक हैराण झाले आहेत.
महाड शहराजवळ असलेल्या शिरगाव आदिवासीवाडीवरील संतोष पवार याच्या घरकुलाची एक भिंत कोसळली. बाहेर सुरु असलेल्या वादळातच भिंत कोसळल्याने घरात असलेल्या पवार कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. पवार यांच्या घरातील सामान, बिछाना भिंती खाली गेल्याने संपूर्ण रात्र आपला कुटुंबियासह जवळच असलेल्या शाळेमध्ये काढावी लागली. संतोष पवार ज्याच्या घराच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन त्याला योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जनसंवाद संस्थेचे अध्यक्ष निलेश पवार यांनी केली आहे.
उष्णतेमुळे पर्यटकांची संख्या रोडावली
राज्यात तापमानाचा पारा चढत असताना हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती, त्यानुसार रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यात सरी बरसल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे तापमानात अचानक वाढ झाली व मुरूडचा पारा 37.05 अंशावर गेला आहे. याचाच परिणाम की काय मुरुडला येणार्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे मुरुड समुद्र किनारी तुरळक पर्यटक दिसत होते. याचा परिणाम पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायाला ही चटके सहन करावे लागले.
गेल्याच महिन्यात मार्च 12, 13, 14 रोजी उष्णतेची लाट आली होती. त्यावेळी मुरुडचा पारा 40 अंशावर गेला होता. आताही हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस पडल्यामुळे व ढगाळ वातावरणामुळे वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झाली. त्यामुळे मुरूडचा पारा वाढण्यास सुरुवात झाली व तापमान 37.05 अंशावर गेल्याने पुन्हा एकदा मुरुड तापला आहे. आता राज्यात सर्वत्र उष्णता वाढल्याने फिरायला येणार्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. या असह्य होणार्या उष्णतेमुळे पर्यटक बाहेर पडणे बंद झाले आहेत. त्यामुळे मुरुडला पर्यटकांची तुरळक गर्दी पहावयास मिळत आहे. मुरूड समुद्र किनारी घोडा गाडी, बग्गी चालक, घोडेस्वार, खाद्यपदार्थांचे स्टॉल, आईस्क्रीम, थंड पेय, खाणावळ, लॉजींग व्यवसायालाही या उन्हाच्या झळा बसत आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाली आहेत.