437 मूर्तिकार उद्ध्वस्त; हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर संकट
| रायगड | प्रमोद जाधव |
पेणच्या गणेशमूर्ती उद्योगाला अतिवृष्टीचा जबर फटका बसला असून तब्बल 437 मूर्तिकारांचे कारखाने बाधित झाले आहेत. कारखान्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने 50 हजारांहून अधिक गणेशमूर्ती, रंगकामाचे साहित्य, साचे, शाडूची माती आणि कच्च्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना मूर्तिकारांसमोर आता ग्राहकांच्या ऑर्डर वेळेत कशा पूर्ण करायच्या, हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. दरम्यान, नुकसानीमुळे कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून, या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून असलेल्या पाच हजारांहून अधिक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून वेळेत भरपाई मिळाल्यास हा उद्योग पुन्हा उभारी घेईल, अशी प्रतिकिया मूर्ती कारखानदारांकडून करण्यात येत आहे.
पेणच्या गणेशमूर्तींना केवळ रायगड किंवा महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकार वर्षभर मेहनत घेऊन बाप्पाच्या विविध आकर्षक मूर्ती साकारतात. यंदाही गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, मुसळधार पावसाने मूर्तिकारांच्या वर्षभराच्या मेहनतीवर क्षणार्धात पाणी फेरले.
पेण शहरासह जोहे, कळवे, शहापूर, तांबडशेत परिसरातील गणेश कला केंद्रांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही तयार मूर्ती पाण्यात वाहून गेल्या, तर काहींचे रंग उडाले. शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या अनेक मूर्ती पाण्यात भिजून अक्षरशः विरघळून गेल्या. रंगकामाचे साहित्य, साचे, कच्चा माल आणि इतर उपकरणांचेही नुकसान झाले आहे.
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना मूर्तिकारांसमोर आता ग्राहकांच्या ऑर्डर वेळेत कशा पूर्ण करायच्या, हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. नुकसान भरून काढण्यासाठी अनेक कारखानदारांनी कामाचे तास वाढवून दिवस-रात्र मूर्ती पूर्ण करण्याची धडपड सुरू केली आहे.
पावसाने मोडली घडी; शासनाच्या मदतीची आस
आधीच कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च आणि बाजारातील स्पर्धेमुळे अडचणीत असलेल्या मूर्तिकारांवर अतिवृष्टीने आणखी मोठे संकट ओढवले आहे. प्रशासनाने 437 कारखानदारांचे नुकसान झाल्याची माहिती दिली असून, शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मूर्तिकारांकडून होत आहे.
अतिवृष्टीचा मोठा फटका
रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवितहानी झाली आहे. 4,913 घरांमध्ये पाणी शिरले, 284 दुकाने, 86 गोठे, 20 पोल्ट्री आणि 5 झोपड्यांचे नुकसान झाले. या आपत्तीत 12 जणांचा मृत्यू झाला असून 11 हजार 436 कोंबड्या आणि 219 पशुधनाची हानी झाली आहे. अनेक कुटुंबे, शेतकरी, पशुपालक आणि पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले असून नुकसानग्रस्तांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे.
मुसळधार पावसामुळे कारखान्यांमध्ये पाणी शिरले. रंग, साचे आणि इतर साहित्याचे नुकसान झाले. अनेक मूर्ती वाहून गेल्या, तर शाडूच्या मातीच्या मूर्ती पाण्यात विरघळल्या. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राहकांना वेळेत बाप्पाच्या मूर्ती कशा द्यायच्या, ही चिंता आहे. गणपती हा आमच्यासाठी केवळ व्यवसाय नाही, तर श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. शासनाने तातडीने मदत केली तर या संकटातून पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळेल.
दीपक समेळ,
मूर्तिकार
