जनजीवन विस्कळीत
। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान खात्याने सलग चार दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला.त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.माणगाव तालुक्यात मंगळवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु झाली.बुधवार पर्यत सुरूच राहिल्याने नागरिकांची कामे खोळंबली.
माणगाव तालुक्यात सोमवारी सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण दिसत होते.त्यामुळे माणगावात जोरदार अतिवृष्टी होईल असा अंदाज अनेकांनी बांधला.मंगळवारी व बुधवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु होती.दिवसभर पावसाच्या सरी पडत राहिल्याने नागरिकांच्या कामांत व्यत्यय आला. महाड तालुक्यात बाजारपेठेत पाणी शिरून तेथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले.तसेच या तालुक्यातील अनेक गावांनाही पुराचा फटका बसून तळिये गावात दरड कोसळून दुर्घटना घडली.तसेच पोलादपूर तालुक्यातही दरडी कोसळल्या.हि घटना ताजी असतानाच पुन्हा हवामान खात्याने चार दिवस जोरदार अतिवृष्टी होणार असल्याने नदी व समुद्रकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला.
माणगावात पावसाची संततधार
![](https://krushival.in/grygrars/2021/09/PAUS-2-1024x541.jpg)