सरासरी भातपिक उत्पादन घटणार; कृषी विभागाचा अंदाज
। पेण । प्रतिनिधी ।
तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात 10 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर शेतकर्यांनी भाताची लागवड केली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे 5 हजार हेक्टरातील भात पिकाचे नुकसान झाले आहे. यंदा झालेल्या या अवकाळी पावसामुळे सरासरी भातपिक उत्पादन घटणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान तालुक्यात यंदा मोठया प्रमाणात शासन नियुक्त विमा कंपनीकडून भातपिक विमा घेतला आहे. परिणामी या शेतकर्यांची नुकसानी झाली असल्यास त्यांना तत्काळ नुकसान भरपाई प्राप्त व्हावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष्याचे ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील यांनी केली आहे. यंदा भाताला आलेल्या दमदार फूलोर्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात यंदा तांदळाची उत्पादकता वाढण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत होती. मात्र परतीच्या पावसाने जो काही धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
उंबरठा उत्पादनाच्या सरासरीवर विमा ठरविला जातो. तसाच हा विमा शेतकापणी झाल्यानंतर होणार्या नुकसानीवर असतो. नैसर्गिकरित्या परतीच्या पावसामुळे भातशेतीचा नुकसान झाल्यास विमा कंपन्या पीक विमा आकारत नाही.
अनिल रोकडे, तालुका कृषी अधिकारी