उपहार गृहाची दयनिय अवस्था
| पेण | प्रतिनिधी |
एक काळ असा होता की, कोकणात जाणारी लालपरी रामवाडी बस स्थानकावर थांबल्याशिवाय पुढे जात नव्हती. परंतु, आज दळनवळनाची साधनं एवढ्या मोठया प्रमाणात वाढली आहेत की, त्यामुळे कित्येक जण लालपरीकडे पाठ फिरवत आहेत. त्यातच शासनाच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील बस स्थानकांची दयनीय अवस्था झाली आहे. गेल्यावर्षी शासनाने ‘हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक’ या अभियाना अंतर्गत पुर्ण महाराष्ट्रात स्पर्धेचे आयोजन केले होते. परंतु, राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षतेपणामुळे हे अभियान कागदारवरच राहिले असून बसस्थानके पहिल्यापेक्षा बिकट झाली आहेत.
रामवाडी बस स्थानकावर सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. त्यातच सीएनजी पंपाचे काम नव्याने सुरू असल्याने अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून पाणी साचलेले आहे. येथील स्वच्छता गृहाची अवस्था तर खुपच वाईट असून स्वच्छता गृहात पाय ठेवणे ही कठीण झाले आहे. तसेच, बस स्थानकाच्या कँटींगची अवस्थाही स्वच्छता गृहासारखीच झालेली आहे. हे कँटींग नसीम उस्मान खोत हे चालवत असून त्यांच्याकडे या कॅनटींगचा ठेका 2033 पर्यंतचा आहे. त्यांना अस्वच्छतेच्या विषयी विचारणा केली असता त्यांनी मी हा ठेका सोडत असून मला परवडत नसल्याचे रडगाणे लावले होते.
यावेळी कृषीवल प्रतिनिधीनी कँटींगमध्ये गेला असता एक भयान सत्य समोर आले. तेथे एका अस्वच्छ प्लॅस्टिकच्या घमेल्यात भजीचा कांदा तर एका घमेल्यात वडयाचा चुरा, पाव असे पदार्थ दिसत होते. तर, पाणी सुद्धा बादल्यांमध्ये भरून ठेवले होते. यामुळे येथे अस्वच्छतेच्या व्याख्येच्या पलीकडची अस्वच्छता पहायला मिळाली.
या संदर्भात अधिकारी वर्गाला विचारणा केली असता तक्रारी अर्ज व फोटो देण्यास सांगितले. तक्रारी अर्ज असल्यास आम्ही कारवाई करू असे सांगण्यात आले. एकंदरीत शासनाच्या नाकर्तेपणामुळे आज रामवाडी सारख्या बस स्थानकाची दयनिय अवस्था झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री स्वतः मुख्यमंत्री असून त्यांनी या बाबींकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तरी लाल परीच्या भविष्यासाठी शासनाने बस स्थानकांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.