| सिंधुदुर्ग | वृत्तसंस्था |
नारायण राणे सत्तेसाठी लाचार असून सत्तेसाठी लाचार झालेल्या नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी परखड टीका रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली आहे. नारायण राणे सत्तेसाठी लाचार, कोणाच्या मेहरबानीने मुख्यमंत्री होते, त्यांनी आपला भूतकाळ आठवावा, असं म्हणत विनायक राऊतांनी नारायण राणेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
विनायक राऊत म्हणाले की, नारायण राणे यांनी आपला भूतकाळ आठवावा, तुम्ही एवढे अब्जाधीश कसे झालात, चेंबूरच्या नाक्यावर असणारा माणूस आज जुहूच्या समुद्रकिनार्यावरील नऊ मजली इमारतीत जाऊन राहतो. कोणाच्या मेहरबानीने मुख्यमंत्री होतो? संपत्ती कशी कमावली? याचा सगळ्याचा हिशोब द्या. उद्धव ठाकरेंवर आरोप करण्याची राणेंची कॅसेट जुनी आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांना इशारा देण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला कोणती बीळ लपायला आहेत, ती शोधा. शिवसैनिक मेलेल्या आईचे दूध प्यायलेला नाही, तुम्हाला कोणत्या बिळात घालून ठेवू, हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. निवडणुकीच्या नंतर यांना बिळातच जावं लागणार आहे, बाकी रस्ते तर सोडाच, असं म्हणत विनायक राऊत यांनी नारायण राणेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.