| उरण | प्रतिनिधी |
जून महिन्यात रानसई धरणाने तळ गाठल्याने उरणकरांच्या घशाला कोरड पडण्याची भीती निर्माण झाली होती. मागील 5 दिवसांपासून कोसळणारे आणि डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे रानसई धरण दुथडी भरून वाहु लागले. त्यानंतर रविवारी (दि.5) मध्यरात्रीच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले. मागील वर्षीही दि.18 जुलै रोजीच धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती उरण एमआयडीसीच्या कार्यालयातून देण्यात आली होती. मात्र, यावर्षी अवघ्या पाच दिवस कोसळणाऱ्या पावसात रानसई धरण ओसंडून वाहत असल्याने उरणकरांची चिंता मिटली आहे.
उरण तालुक्यातील रानसई धरणाची उंची 166 फुट उंचीच्या रानसई धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याची पातळी 86 फूट असून, या धरणावर उरण शहरासह तालुक्यातील 25 गावे, विविध औद्योगिक प्रकल्प आणि लाखो नागरिकांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. जून महिनाभर अपेक्षित पाऊस न झाल्याने रानसई धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला होता. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, धरणाने डेड स्टॉक गाठल्याने पाणीपुरवठ्यावर निर्बंध आणण्याची वेळ आली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जुलैच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण चित्रच बदलून टाकले. त्यातच डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे रविवारी (दि.5) रात्री 1 वाजल्यापासून धरण दुथडी भरून वाहू लागले आहे. त्यामुळे उरणकरांची पाणी टंचाईचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. एकंदरी रानसई धरण ओसंडून वाहत असल्याने पर्यटकांनी तसेच तरुणांनी धरण परिसरात जाऊ नये, असे आवाहन एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
एकीकडे मुसळधार पावसामुळे उरण शहर आणि तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असली, तरी दुसरीकडे रानसई धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाले आहे. त्यामुळे पावसाने काही ठिकाणी संकट निर्माण केले असले, तरी उरणकरांच्या भविष्यातील पाण्याची चिंता मात्र मोठ्या प्रमाणात कमी केल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
चौकटः
एमआयडीसीचा इशारा
मागील वर्षी रानसई धरण दि.18 जुलै रोजी पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात धरण ओसंडून वाहू लागल्याने यावर्षीच्या पावसाचा जोर किती प्रचंड आहे, याची प्रचिती आली आहे. दरम्यान, रानसई धरण ओव्हरफ्लो झाल्याची माहिती मिळताच परिसरात नागरिक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन एमआयडीसी प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. धरण परिसरातील पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी, सेल्फी काढण्यासाठी किंवा पाण्याजवळ जाण्याचा मोह टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
