। मुंबई । प्रतिनिधी ।
देशात एकता आणि अखंडता राखण्याचे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम गृह मंत्रालयाचे आहे. ज्या शक्ती वारंवार औरंगजेबाचे नाव घेऊन देशात अस्थिरता निर्माण करतात. त्यांना रोखले नाही, तर हा देश एक राहणार नाही. तसेच, तुम्हाला औरंगजेबाची कबर काढायची तर फावडे घेऊन जा. तुमची मुलं पाठवा, गरिबाची मुलं पाठवू नका, अशी टीका शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राज्यसभेत बोलताना राऊतांनी औरंगजेबच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले. ते म्हणाले की, गृह मंत्रालयावर आपण चर्चा करत आहोत आणि मी बघितले की आपल्या बऱ्याच सदस्यांनी औरंगजेबावर चर्चा केली. काय दिवस आले आहेत, या वरिष्ठ सभागृहात औरंगजेबावर लोक चर्चा करत आहेत. आणि मला वाटतं की, याला जबाबदार आपले गृह मंत्रालय आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, कालपर्यंत मणिपूर जळत होता. परंतु, आता महाराष्ट्रही पेटवला आहे. नई लाशे बिछाने के लिए, आपने गड़े मुर्दे उखाड़े, तेही औरंगजेबाच्या नावाने. तसेच, तीनशे वर्षात नागपूरमध्ये कधी दंगल झाली नाही. नागपूरचा इतिहास आहे. नागपूरसारख्या शहरात दंगल होते आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या शहरात, अशी टीका राऊतांनी केली.
तसेच, मला हे सांगायचं आहे की, जर तुम्हाला औरंगजेबाची कबर तोडायची आहे, तर बिनधास्त तोडा. तुम्हाला कोणी रोखले आहे? तुमचे सरकार आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रात तुमचे सरकार आहे. गृहमंत्री तुमचे आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री तुमचे आहेत. फावडे घेऊन तिकडे जा आणि तोडा. परंतु, तुमच्या मुलांना पाठवा. आमच्या मुलांना पाठवू नका. तुमची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत. परदेशात काम करत आहेत. आणि गरीब मुलांना पाठवू नका, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
तर हा देश एक राहणार नाही
देशाच्या गृह मंत्रालयाने जर वेळीच अशा ज्या शक्ती आहेत, ज्या वारंवार औरंगजेबाचे नाव घेऊन देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. त्यात काही लोक असे आहेत, जे महाराष्ट्रात मंत्री आहे. जे केंद्रात उच्चपदी आहेत. त्यांना जर आपण रोखले नाही, तर हा देश एक राहणार नाही. देशात एकता आणि अखंडता ठेवण्याचे काम गृह मंत्रालयाचे आहे, असा इशारा राऊतांनी दिला.