जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीतून निर्णय
| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीतून पगारदार खातेदारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच इतर पगारदार खातेदारांना तब्बल 50 लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. यामुळे हजारो शिक्षक आणि पगारदार कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार असून, अनपेक्षित परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाला सुरक्षिततेचे भक्कम कवच उपलब्ध होणार आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी दिली.
ते म्हणाले की, 50 लाख रुपयांपर्यंतच्या विमा कवचामुळे खातेदारांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. आकस्मिक मृत्यू किंवा अनपेक्षित परिस्थिती उद्भवल्यास संबंधित खातेदाराच्या कुटुंबाच्या हातात तातडीने मोठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कुटुंबातील मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च तसेच कर्जफेड यांसारख्या जबाबदाऱ्या पार पाडणे सुलभ होणार आहे.
विशेषतः शिक्षक आणि पगारदार कुटुंबांच्या भविष्यासाठी हे विमा कवच महत्त्वाचे संरक्षण ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बँकेच्या स्थापनेपासून पगारदार खातेदारांचा बँकेच्या प्रगतीत मोठा वाटा आहे. काळाच्या गरजेनुसार त्यांना अधिक सुरक्षितता देणे ही बँकेची सामाजिक जबाबदारी असल्याची भूमिका बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील आणि संचालक मंडळाने घेतली असून, त्यातून हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचे वर्तक यांनी सांगितले.
दरम्यान, रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर पगारदार खातेदारांना बिनव्याजी ॲडव्हान्स रक्कम उपलब्ध करून देण्याचा निर्णय बँकेने यंदाही कायम ठेवला आहे. सलग तिसऱ्या वर्षी ही सुविधा देण्यात येत असून, रमजान ईद, गणेशोत्सव, दिवाळी यांसारख्या सणासुदीच्या काळात किंवा तातडीच्या गरजेच्या वेळी खातेदारांना आर्थिक मदत मिळावी, हा या योजनेमागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
सणासुदीच्या काळात अचानक आर्थिक अडचण निर्माण झाल्यास खातेदारांना त्वरित मदत मिळावी आणि त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागू नये, यासाठी बँकेकडून ही सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे बँक प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने व्यवसायाच्या बाबतीतही महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, बँकेचा एकूण व्यवसाय 7250 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अभिनव योजना, ग्राहककेंद्रित सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक सुरक्षिततेसाठी पुढाकार घेणारी राज्यातील पहिली जिल्हा बँक म्हणून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा एकदा पुढे आली आहे. या अभिनव योजनांचा लाभ घेण्यासाठी पगारदार खातेदारांनी आपल्या जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँकेच्या केंद्र कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.







