। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दि. ८ जुलै २०२२ रोजी पर्यंत रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सखल व दरडप्रवण गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भरतीच्या वेळी अतिवृष्टी होत असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रयास जावे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी, पर्यटकांनी व नागरिकांनी समुद्रात पोहण्यास जावू नये.
पूर व दरडप्रवण भागातील नागरिकांनी आपली महत्वाची कागदपत्रे, मौल्यवान दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा असल्याने घरातील वयोवृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्तींसाठी आवश्यक औषधे, पिण्याचे पाणी, टॉर्च, मेणबत्ती, माचिस, ड्राय फूड यांचा पुरेसा साठा करून ठेवावा. पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता असते, त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून प्यावे. महिला, लहान मुले यांची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासना तर्फे करण्यात आले आहे