कोणताच ऐतिहासिक पुरावा नाही; संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
। मुंबई । वृत्तसंस्था ।
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी शेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार 31 मे 2025 पर्यंत वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारली. पण शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख किंवा संदर्भ मिळत नसल्याचे संभाजीराजे यांनी पत्रात म्हटले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले की, वाघ्या कुत्र्याच्या समाधी संरचनेबाबत वा वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व याबद्दल भारतीय पुरातत्व विभागानंही कोणतेच ऐतिहासिक दस्ताऐवज किंवा पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. समस्त भारतवासियांचे श्रद्धास्थान असणार्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका काल्पनिक कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. भारतवासियांच्या श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ही घोर प्रतारणा आहे.
कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून, राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. 31 मे 2025 अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक असल्याचंही संभाजीराजे यांनी पत्रात नमूद केले आहे.