शिवसेनेची मागणी
| खोपोली | वार्ताहर|
खालापूर तालुक्यातील चिंचवली गोहे येथील पुलाची दुरुस्ती केली जावी,अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. हा पूल 60 ते 70 वर्षांपूर्वी बांधलेला असून त्याकाळात अवजड वाहनांची रहदारी नव्हती. आज घडीला अनेक कंपन्यांचे 40 ते 50 टनांची अवजड वाहने जात असून सदर पूल धोकादायक व पडण्याच्या स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पुलावरुन नागरिकांना प्रवास करावा लागत असल्याने या धोकादायक पुलामुळे भविष्यात मोठी जिवीतहानी व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. असताना याकडे संबधित प्रशासनाचे दुर्लक्ष करीत असल्याने याबाबत शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. याबाबत उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कार्यालयात निवेदन देत चिंचवली गोहे ब्रीजची नव्याने बांधावे व होनाड ब्रीजची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे. यावेळी चिंतामणी चव्हाण, महेश पाटील, अक्षय देशमुख, निलेश पाटील, विभाग प्रमुख सुशील गंभीरराव, श्रीराम पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
होनाड ब्रीजवर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. तर सदर ब्रिजवर वाहनांचे अपघात होत असून त्यामुळे नागरिकांना तसेच शाळेतील विदयार्थ्यांना सदर ब्रीजवरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे पाहायला मिळत असून या दोन्ही ब्रीजची दुरुस्ती लवकर व्हावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून 2 जुलै खालापुरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांना निवेदन देत लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. तसेच यावर लवकर उपाययोजना न झाल्यास शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला आहे.