उपोषणाचा सरपंच निखील मयेकर यांचा इशारा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नागाव बंदर येथील नादुरुस्त रस्ता दुरुस्त करण्यासाठी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी या मुख्य मागणीसाठी नागावचे सरपंच निखिल मयेकर यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु न केल्यास उपोषण करण्याचा इशारा सरपंच निखील मयेकर यांनी दिला आहे. नागांव बंदर रस्ता करणे या संदर्भात नागाव ग्रामपंचायतीमार्फत अनेकदा शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. परंतु शासनाकडून नागांव बंदर रस्त्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची दखल कार्यवाही करण्यात आली नाही. याकडे दुर्लक्ष का केल्या याचा जाब ग्रामस्थांच्यावतीने शासनाला विचारण्यात आला आहे. या निवेदनावर लेखी उत्तर तात्काळ मिळण्याची मागणी करण्यात आले आहे. नागांव बंदर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. सदरचा रस्ता पर्यटन व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा असून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पर्यटन व्यवसायावर त्याचा अत्यंत दुष्परिणाम होत आहे. सदर रस्त्यावर अनेक अपघात होण्याची खूप शक्यता आहे. तसेच रस्त्यावरून नेहमी आणायेणार्या ग्रामस्थांना अधिकच हाल होत आहेत. ग्रामस्थ आता प्रचंड प्रमाणात आक्रमक झाले असून सदर रस्ता लवकरात लवकर न झाल्यास उपोषण किंवा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने सरपंच निखील मयेकर यांनी दिला आहे. त्यामुळे रस्त्याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील याची नोंद घेत नागांव बंदर रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.






