। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गुजरातहून मासेमारी करण्यासाठी आलेले जहाज मुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्याच्या मागील बाजूस कालपासून अडकले होते. हे जहाज मोरे गावाच्या समुद्रकिनारी असलेल्या गावदेवी मंदिरापासून जवळपास 1 ते 2 किमी अंतरावर अडकून पडले होते. त्यातील खलाशांना वाचविण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचार्यांसहित तालुका प्रशासन मंगळवारी (दि.9) रात्रीपासून प्रयत्न करीत होते.
सकाळी 10 वाजता तटरक्षक दलाच्या हॅलिकॉप्टरला पाचारण करण्यात आल्यानंतर जवळजवळ 12 तास समुद्रात अडकून पडलेल्या खलाशांच्या सुटकेचे थरारनाट्य सुरू झाले. 11 वाजता तटरक्षक दलाचे जवान हॅलिकॉप्टरमधून जहाजात उतरले आणि त्यांनी एकामागून एक असे दहाही खलाशांना सुखरूप बाहेर काढले.
वाचलेल्या खलाशांमध्ये राजेश किशन हरबदी (वय 24, रा.तालुका पारधी जिल्हा वलसर), आशिष रमेश वारली (वय 24 रा.ता.उमरगा, जिल्हा वलसाड), लिवेश काकडीया (वय 22 रा.ता.उमरगा, जि.वलसाड), अश्वीन बयला (वय 24 रा. ता.उमरगा, जि. वलसाड), निष राकेशभाई हडपती (वय 26 रा. ता.पारधी जि.वलसाड), बिर बाबुलाल बायमाची (वय 13 रा.वलसाड), अजय चंदुभाई नायब (वय 25 रा. ता.उदवाडा, जि.वलसाड), बंटी चन्नयाभाई माची (वय 28 रा.ता.उमरगा जि.वलसाड), निखिल निलेशभाई माची (वय 19 राहणार ता.उमरगा जि.वलसाड), शुभम सुभाषभाई माची (वय 10 रा. ता.उमरगा जि.वलसाड) यांचा समावेश आहे.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे हे मुरूड तहसिलदार यांच्याकडून वेळोवेळी माहिती घेत होते. अखेर सीमा तटरक्षक दलाने प्रयत्नाची शर्थ करीत हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने जहाजात उतरून अतिशय थरारकरित्या सर्व खलाशांनी सुटका केली.
अखेर बुधवारी दुपारच्या सुमारास खलाशांची सुटका करण्यात प्रशासनाला यश आले असल्याची माहिती मुरुडचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी दिली.