। अलिबाग । प्रतिक कोळी ।
ऐतिहासिक संघर्षाचा वारसा लाभलेल्या चरी या गावातील तरुणांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे. कृतीशील शेतकरी तथा समाजाचा कळवळा असणारे दत्तात्रेय थळे यांना श्रद्धांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, माणूसकी हरवलेल्या या जगात चरीच्या तरुणांनी नवीन आदर्श समाजापुढे प्रस्थापित केला आहे. चरी गावचे ग्रामस्थ दत्तात्रेय थळे (45) यांचे नुकताच वाहन अपघातात निधन झाले. एकीकी आलेल्या या दुःखद बातमीने त्यांच्या परिवारासह संपूर्ण गावात शोककळा पसरली. अत्यंविधीचे संस्कार पूर्ण झाल्यानंतर दत्तात्रेय थळे यांच्या मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा कळली. पण वेळ निघून गेली होती. गावातील प्रसन्न, मनमिळाऊ आणि सामाजिक जाण असलेल्या दत्तात्रेय थळे यांनी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी श्रद्धांजली म्हणून त्यांची जी इच्छा पूर्ण झाली नाही, ती इतरांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा विचार समोर आला. महत्त्वाचे म्हणजे तो सर्वांना पटला.
यानुसार अनंत थळे यांनी मार्गदर्शन तथा नोंदणी शिबिराचे आयोजन केले. दत्तात्रेय थळे यांना शाब्दिक श्रद्धांजली वाहण्यानंतर नेत्रचिकित्सिक विजयकुमार जाधव यांनी नेत्रदान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या शंकाकुशंकांचे निरसण केले. यानंतर नेत्रदानाचा संकल्प करत एकूण 45 तरुणांनी नेत्रदानाचे अर्ज भरले. हे अर्ज डॉ.जाधव यांचेकडे सूपूर्द करण्यात आले असून, त्यांनी ते संबंधित आस्थापनेकडे जमा केले आहेत. या आगळ्यावेगळ्या श्रद्धांजलीमुळे या तरुणाईला समाधान लाभले असून, त्यांनी समाजापुढे निर्माण केलेला आदर्श निश्चितच अनुकरणीय आहे.