वडखळ, वाशी, शिर्की परिसरात मिठागरे जोरात
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
समुद्रातील वाढते प्रदूषण, कंपन्यांमार्फत होणारा भराव, बदलते हवामान अशा अनेक कारणांमुळे पारंपरिक मीठ व्यवसाय कालबाह्य होण्याच्या मार्गावर होता. मात्र, पेणमधील काही शेतकर्यांनी पुढाकार घेत या व्यवसायाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. शिर्की, वाशी, वडखळ परिसरात तीनशे एकर क्षेत्रामध्ये आता मिठागरे उभी राहिली असूून, यातून अनेकांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे. त्यामुळे हा व्यवसाय आता पुन्हा उभारी घेण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.
![](http://krushival.in/grygrars/2024/05/DSF1021-1-scaled-e1715779797801-1024x573.jpg)
पेण तालुक्यातील शेतकर्यांचा मीठ तयार करण्याचा व्यवसाय पारंपरिक आहे. तालुक्यातील वाशी, वडखळ, शिर्की अशा अनेक भागातील शेतकरी हा व्यवसाय करीत होते. पूर्वी तालुक्यात सुमारे दोन हजार 200 एकर क्षेत्र मिठागरांनी व्यापले होते. त्यातून मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन घेतले जायचे. यातून एक हजारहून अधिक जणांना रोजगार मिळत होता. स्वयंपाक करण्यासाठी या मिठाला प्रचंड मागणी असताना, आंबा कलमांसाठीदेखील मिठाला पसंती दिली जात होती. परंतु, जिल्ह्यात, विशेष करून पेण तालुक्यात ठिकठिकाणी वेगवेगळे प्रकल्प उभे राहिले. प्रकल्पासाठी ठिकठिकाणी मातीचा भराव करण्यात आला. कंपनीतील सांडपाणी समुद्रात सोडले जाऊ लागले. त्याचा परिणाम मीठ व्यवसायावर मोठ्या प्रमाणात झाला. समुद्राच्या खार्या पाण्यातील मीठ तयार होण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. त्याच दरम्यान बाजारात पॅकिंग मीठ दाखल झाले. त्यामुळे हा व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर होता. मिठागरे कालबाह्य होण्याच्या परिस्थितीत होती. मात्र, पेण तालुक्यातील कल्पेश पाटील, धनेश पाटील, रमेश पाटील, अभिमन्यू पाटील आदी काही तरुण शेतकर्यांनी पुढाकार घेत मिठागरांची निर्मिती करुन पुन्हा एकदा मीठ तयार करण्याचा व्यवसायाला नवसंजीवनी मिळवून दिली आहे.
वाशी, शिर्की, चिखली, वडखळ या परिसरात सुमारे 350 एकर क्षेत्रामध्ये मिठागरे तयार करण्यात आली आहेत. या व्यवसायातून लाखोंचे उत्पन्न शेतकर्यांना मिळत आहे. हे मीठ वीटभट्टी, आंबा कलम, बर्फ कारखाना, तसेच खाण्यासाठीदेखील पाठविले जात आहे. तीन ते चार रुपये प्रति किलो दराने त्याची विक्री होत आहे. आतापर्यंत येथील उत्पादित 20 हजार टन मीठ स्थानिक बाजारात, तसेच रायगडसह रत्नागिरी व अन्य जिल्ह्यांतील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती कल्पेश पाटील यांनी दिली.
माझे आजोबा, वडील पूर्वी मीठ तयार करण्याचा व्यवसाय करीत होते. आता मी हा व्यवसाय करीत असून, आमची चौथी पिढीदेखील काम करीत आहे. दिवाळीपासून या व्यवसाला सुरुवात होते. मीठ तयार होण्यासाठी 15 दिवसांचा काळ जातो. आता 65 एकर क्षेत्रामध्ये मिठागरे तयार केली असून, यासाठी सुमारे 35 लाख रुपये खर्च आला. खर्च वजा करून सुमारे 25 लाख रुपये निव्वळ नफा यातून मिळेल, अशी अपेक्षा आहे.
कल्पेश पाटील,
मीठ व्यावसायिक,
पेण