न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
। नेरळ । वार्ताहर ।
बदलापूर सोनिवली येथील रिक्षाचालक यांच्यावर नेरळ जवळ पेशवाई रस्त्यावर निर्जन स्थळी २२मे रोजी रात्री गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी थोडक्यात बचावलेले रिक्षाचालक यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या रिक्षाचालक यांच्या गावातील व्यक्तीला अखेर या गुन्ह्यात अटक केली आहे. दरम्यान, रायगड पोलिसांची वेगवेगळी पथके गोळीबार करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी तैनात असून रिक्षाचालक यांना ठार मारण्याची सुपारी देणाऱ्या बदलापूर सोनिवली गावातील व्यक्तीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बदलापूर शहरातील सोनिवली गावातील सदानंद शिवाजी मुंढे या रिक्षाचालक यांना कर्जत येथे महाराजांकडे जायचे आहे असे सांगून भाड्याने रिक्षा घेवून येणाऱ्या प्रवाशाने रिक्षाचालक मुंढे यांच्यावर गोळीबार केला होता.२२मे रोजी रात्री दहाचा सुमारास नेरळ जवळील रात्री निर्जन असलेल्या पेशवाई रस्त्यावर रिक्षातील भाडेकरू प्रवासी याने गोळीबार केला होता.मात्र जखमी अवस्थेत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून रिक्षाचालक सदानंद मुंढे यांनी उल्हासनदी मध्ये उडी घेवून नदी पार करीत जीव वाचवला होता.सध्या रायगड हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेले रिक्षाचालक मुंढे यांनी आपली फिर्याद नोंदवताना आपल्या सोनिवली गावातील एका व्यक्तीने मला ठार मारण्याची सुपारी दिली असावी असा संशय व्यक्त केला होता.त्यानंतर पोलिसांनी २३मे चा सकाळी गुन्हा दाखल होताच नेरळ पोलिसांच्या पथकाने सोनिवली येथे जावून संशय व्यक्त केलेल्या व्यक्तीला सदानंद मुंढे यांच्यावरील गोळीबारप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
गोळीबार झाल्याची माहिती मिळताच रायगड जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी उपअधीक्षक विजय लगारे,पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, राजेंद्र तेंडुलकर,प्रभारी अधिकारी शेखर लव्हे,सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी यांनी तपास कार्य सुरू केले. बदलापूर येथील व्यक्तींना कर्जत तालुक्यातील निर्जन स्थळी बोलावून गोळीबार करण्याची घटना घडल्याने खऱ्या आरोपीला पकडण्यासाठी रायगड पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक,स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक त्याचवेळी नेरळ पोलिसांच्या मदतीला कर्जत,खालापूर, खोपोली,रसायनी या पोलीस ठाणे यांचे अधिकारी यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी वेगवेगळी जबाबदारी दिली. दूसरीकडे नेरळ पोलिसांनी या गोळीबार प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले सोनिवली गावातील त्या व्यक्तीला अटक केली आहे. २३मे रोजी रात्री सोनिवली गावातील त्या व्यक्तीला अटक केल्यानंतर आज २४मे रोजी कर्जत येथे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या व्यक्तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गोळीबार प्रकरणी अनेक मुद्दे समोर येत असून रिक्षातील भाडेकरू प्रवासी याला नेरळ जवळील दामत रेल्वे फाटक ते साई मंदिर हा पेशवाई रोड रात्री नऊ नंतर निर्जन असतो याची माहिती आधीच होती कि त्याने या भागात येवून आधी रेकी केली होती काय? याचा शोध पोलिसांचे पथक घेत आहेत. त्याचवेळी आपली माहिती सहजासहजी कोणाला मिळू नये म्हणून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने नेरळ भागात येवून रिक्षाचालक याचा खून करण्याचा प्लॅन केला होता काय?याची चाचपणी देखील पोलीस पथकाकडून घेतली जाऊ शकते. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील सर्व सीसीटिव्ही कॅमेरे यांचे फुटेज तसेच रेल्वे फाटक येथील सीसीटिव्ही तपासले जात आहेत. त्याचवेळी त्या सराईत गुन्हेगार असलेल्या रिक्षातील प्रवासी याने गोळीबार केला त्याआधी त्याच्या मोबाईल वर पाच तास कोणाचेही फोन आले नाही आणि फोन केले ते केवळ रिक्षाचालक मुंढे यांना आणि त्यामुळे पोलिसांना त्या प्रवासी हा सराईत गुन्हेगार असावा असा संशय बळावला असून त्या दृष्टीने तपास सुरू केला असल्याचे बोलले जात आहे.तर दुसरीकडे गोळीबार झाल्यानंतर त्या रस्त्याने एक दुचाकी वेगाने गेली असल्याचे काही स्थानिक सांगत आहेत.त्याचवेळी त्या गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने स्थानिक रस्त्यांची आधीच रेकी केली होती की आणखी कोणी साथी बाहेर दबा धरून होता, याची माहिती पोलीस घेत असून आरोपी पर्यंत पोलीस कधी पोहचतात?याकडे लक्ष्य लागून राहिले आहे.