समर्थकांनी फेकल्या माव्याच्या थुंकीने भरलेल्या बाटल्या, दगड; पोलिसांचा लाठीमार
| कोल्हापूर |वृत्तसंस्था |
शाहू मैदानावर रंगलेल्या श्री शिवाजी तरुण मंडळ विरुध्द पाटाकडील तालीम ‘अ’ या संघांतील अटीतटीच्या सामन्यात अतिउत्साही व हुल्लडबाज समर्थकांनी दगड, बाटल्यांसह चपला मैदानावर भिरकावल्या. या प्रकाराने मैदानावर गोंधळ व तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव पांगवला.
श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघांदरम्यान झालेल्या सामन्यात दगडफेक झाली. अटीतटीच्या ठरलेल्या सामन्यात अतिउत्साही समर्थकांनी अर्वाच्च शिवीगाळ केली. प्रेक्षकांच्या या कृतीमुळे मैदानावरील खेळाडूंमध्येदेखील जुंपली. मध्यंतरापर्यंत सामना सुरळीत सुरू होता. चेंडूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये चढाओढ सुरू होती. अशातच समर्थकांनी विरुद्ध संघाच्या खेळाडूंना प्रेक्षक गॅलरीतून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूच्या समर्थकांनी अर्वाच्च शिवीगाळ करत थेट मैदानावर बाटल्या, चप्पल, दगड भिरकावले. त्याला खेळाडूंनीही प्रत्युत्तर दिले. असे दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून वारंवार होत राहिले. याचा परिणाम खेळाडूंवर होऊन त्यांच्यामध्येही वाद होऊ लागले. अखेर समर्थकांनी माव्याच्या थुंकीने भरलेल्या बाटल्या, गिलाव्याचे तुकडे, दगड, चप्पल अशा मिळेल त्या वस्तू मैदानावर व विरुद्ध संघाच्या समर्थकांच्या दिशेने भिरकवायला सुरुवात केली.
दगड लागल्यामुळे काही समर्थक जखमीही झाले. यामुळे मैदान परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. अखेर परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. प्रेक्षक गॅलरीमध्ये असणारा गिलावा फोडून त्याचा वापर दगडाप्रमाणे करण्यात आला. हे तुकडे मैदानावर लांब पल्ला गाठत होते. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तरीही मैदानाबाहेर चौकामध्ये समर्थक तळ ठोकून होते. पोलिसांची अपुरी संख्याही यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप मंडळ संघाचे विशाल बोंगाळे यांनी केला. त्यांनी केएसए कार्यालयात पोलिस बंदोबस्तासाठी अर्ज केला होता का? असा सवाल उपस्थित केला. यावर केएसएच्यावतीने कोणतेच उत्तर देण्यात आले नाही. ‘केएसए’ ने प्रेक्षक गॅलरीमधील गैरप्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत; मात्र पोलिसांनी झालेला प्रकार समजून घेण्यासाठी चित्रीकरणाची मागणी केली असता, ते कार्यान्वित नसल्याचे कारण ‘केएसए’ कडून देण्यात आले आहे. प्रेक्षकांकडून खेळाडूंच्या दिशेने भिरकावण्यात आलेल्या चपला व बाटल्या खेळाडूंनी परत प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावल्या. या कृतीमुळे खेळाडू व प्रेक्षकांमध्ये जुंपली. अखेर प्रशिक्षक शिवाजी पाटील यांनी खेळाडूंना आवर घालत बाजूला नेण्याचा प्रयत्न केला.