जिल्ह्या रुग्णालयामुळे 421 पैकी 419 जणांवर यशस्वी उपचार; दोन मृत्यूंची नोंद
| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मागील वर्षभरात लक्षणीय वाढ झाली आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाने या रुग्णांना दिलेल्या तत्पर व प्रभावी उपचारांमुळे 419 जणांचे प्राण वाचले आहेत. एकूण 421 सर्पदंशग्रस्त रुग्ण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. यापैकी बहुसंख्य रुग्णांवर वेळेवर उपचार झाल्याने ते पूर्णपणे बरे झाले असून, उपचारास उशीर झाल्यामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम तसेच जंगलालगतच्या भागात सापांचा वावर अधिक आहे. शेतीकाम, घराभोवती वाढलेली झुडपे, रात्रीच्या वेळी अपुरी खबरदारी आणि अंधश्रद्धा यामुळे सर्पदंशाच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सर्पदंश रुग्णांसाठी विशेष तयारी केली आहे. जिल्हा रुग्णालयात अँटी-स्नेक व्हेनमचा पुरेसा साठा, आवश्यक आपत्कालीन औषधे, तसेच प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिका 24 तास कार्यरत ठेवण्यात आल्या होत्या.
रुग्ण दाखल होताच तातडीने तपासण्या करून उपचार सुरू करण्यात येत असल्याने गंभीर अवस्थेतील अनेक रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले. डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे सर्पदंश उपचार यशस्वी ठरले असल्याचे प्रशासनाने नमूद केले. दरम्यान, सर्पदंशानंतर पहिल्या काही तासांत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. वेळेत रुग्णालयात पोहोचलेल्या रुग्णांची प्रकृती लवकर सुधारली, तर उशिरा दाखल झालेल्या काही रुग्णांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाली.
सर्पदंश रुग्णांसाठी विशेष व्यवस्था
जिल्हा रुग्णालयात सर्पदंश उपचारासाठी अँटी-स्नेक व्हेनम, आपत्कालीन औषधे आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथक 24 तास उपलब्ध आहे. रुग्ण दाखल होताच तातडीने उपचार सुरू केले जातात.सर्पदंश झाल्यास घरगुती उपाय किंवा अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता तत्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावे. रात्री टॉर्चचा वापर, घराभोवती स्वच्छता, झुडपे काढणे तसेच पायात चप्पल किंवा बूट घालणे यासारख्या खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी यांनी दिली.







