अभिमन्यू इश्वरनला मिळणार संधी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग-डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. दोन्ही संघ दोन कसोटीत आमनेसामने येतील. पहिली कसोटी सेंच्युरियनमध्ये खेळवली जाणार आहे. तर, दुसरी कसोटी केपटाऊनमध्ये खेळवली जाईल. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.
कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघला मोठा धक्का बसला आहे. ऋतुराज गायकवाडच्या बोटाला दुखापत झाल्याने कसोटी मालिकेतून तो बाहेर पडला. बीसीसीआयने त्याच्या ऐवजी अभिमन्यू इश्वरनची निवड केली आहे. ऋतुराजने एकदिवसीय आणि टी-20 या दोन्ही सामन्यांमध्ये पदार्पण केले आहे, परंतु अद्याप कसोटीत एकही सामना खेळलेला नाही. भारत ‘अ’ संघाचा माजी कर्णधार अभिमन्यू ईश्वरनचा संघात समावेश केला जाऊ शकतो. ईश्वरन बंगाल संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याला 88 प्रथम श्रेणी सामने खेळण्याचा अनुभव आहे आणि याआधीही तो टीम इंडियामध्ये सामील झाला होता. ईश्वरनने दीर्घकाळ भारत-अ चे नेतृत्व केले आहे.