ठेकेदारांमुळे रस्त्याचे काम रखडले

सरेभाग ग्रामस्थांची फरफट; प्रांत कार्यालयासमोर उपोषण
| पेण | वार्ताहर |

पेण तालुक्यातील वाशी -सरेभाग रस्त्याचे काम ठेकेदाराच्या दिरंगाईने रखडल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून,या रस्त्याचे कम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी ग्रामस्थांच्यावतीने प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले. वाशी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वाशी सरेभाग हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सन 2018 मध्ये मंजुर होवून त्या रस्त्याच्या कामाचा ठेका 18 एप्रिल मध्ये मे. व्ही.एस. कन्स्ट्रक्शन, खोपटा- उरण या कंपनीला देण्यात आलेला होता. सदरचे काम पुर्ण करण्याची मुदत 12 महिने इतकी होती. काम सुरू करून दिलेली मुदत संपून 21 महिने अधिक झाले तरीही ठेकेदाराने आत्तापर्यंत अवघे 30 टक्केच्या जवळपास इतकेच काम केलेले आहे. ठेकेदाराने आतापर्यत केलेले काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे असून, काम पूर्ण होण्यापूर्वीच हा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे.

वाशी सरेभाग येथील रस्त्याच्या कामाची लांबी 4/650 कि.मी. इतकी आहे व हे काम करण्यास हा ठेकेदार सक्षम असल्याची खात्री न करता त्याला हे काम दिल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या कामात दोन पुलांचा समावेश असून या ठेकेदाराने एकाही पुलाचे काम अद्याप सुरू केलेले नाही. यातील एका ठिकाणी ग्रामस्थांनी स्वखर्चाने जाण्या येण्यासाठी 25 मीटर लांब व दीड फूट रुंद लाकडी तरंगता साकव (पुल) तयार केला असुन हा साकव सद्यस्थितीत मोडकळीस आला आहे. यावरुन रहदारी करतांना कधीही अपघात होवून जिवीत हानी होऊ शकते. रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे व या नविन रस्त्यावरून जाणे येणे केल्याने जुने पारंपारिक मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या याच मार्गावरून जीव धोक्यात घालून सरेभाग गावात जाणार्‍या व येणार्‍या ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे.

तसेच ग्रामस्थांना पिण्याचे पाणी वाहून नेण्याचा मार्ग व शेतामध्ये पिकविलेला धान्य विकण्या करिता घेउन जाण्याचे कामही याच तरंगत्या पुलावरून करावे लागत आहे. रस्ता व पुला अभावी गेली अनेक वर्ष ग्रामस्थांना खूप मोठया अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अधिकारी वर्ग देखील सरेभाग ग्रामस्थांच्या भावनेशी खेळ करत असून तारीख पे तारीख देत आहेत. अधिकारी वर्गाच्या चालढकल पणाला कंटाळून वाशी ग्रामस्थांनी कोरोनाचे सर्व निबंध पाळून प्रांत कार्यालय येथे उपोषणाला बसले आहेत. यामध्ये सरपंच गोरखनाथ पाटील, सदस्य रेशमा म्हात्रे, रुपेश पाटील, नारायण म्हात्रे, जयमाला पाटील, मिनाक्षी पाटील, राजन झेमसे, परशुराम पाटील, अदी प्रमुख मंडळी उपोषणाला बसले आहेत.

तर रास्ता रोको करु
12 महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण करायचे होते. मात्र आत्तापर्यंत 22 महिने पूर्ण होउन ही 25 टक्के ही रस्त्याचे काम झालेले नाही. जे रस्त्याचे काम झाले आहे त्यापैकी काही रस्ता आपोआपच खाडीत सरकला आहे. याचाच अर्थ जे काम केले आहे ते पूर्णताः निकृष्ट दर्जाचे आहे. अशा ठेकेदारांना काळया यादीत टाकणे गरजेचे आहे. आज आम्ही सर्व वाशी ग्रामपंचायतचे लोकप्रतिनिधी सनदशिल मार्गाने उपोषणाला बसलो आहोत. परंतु एवढे करून ही जर शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही वाशी नाका येथे रास्ता रोको केल्याशिवाय राहणार नाहीत. असे प्रसार माध्यमांशी बोलताना वाशी सरपंच व सदस्य यांनी सांगितले.

Exit mobile version