बीसीसीआयचे सचिव जय शहा यांचे वक्तव्य
| मुंबई | प्रतिनिधी |
टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढील वर्षी जूनमध्ये सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी आयपीएलचे आयोजन केले जाणार आहे. तसेच जानेवारी महिन्यात भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध ट्वेन्टी-20 मालिकाही खेळणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा पुन्हा टी-20 खेळणार की नाही, या निर्णयाची घाई करण्याची अजिबातच आवश्यकता नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा म्हणाले. महिला प्रीमियर लीगसाठी (डब्ल्यूपीएल) मुंबईत पार पडलेल्या लिलावासाठी ते उपस्थित होते.
रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 व एकदिवसीय संघात स्थान न मिळाल्याने त्याच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच हार्दिक पंड्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्त होण्यासाठी मेहनत घेत आहे. त्यामुळे संघाच्या नेतृत्वाबाबतही चर्चा होत आहे. हार्दिकबाबत विचारले असता शहा म्हणाले, “आम्ही हार्दिकच्या सुधारणेवर लक्ष ठेवून आहोत. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) आहे आणि संघात पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत आहे.
राहुल द्रविड आणि अन्य सहाय्यक प्रशिक्षकांचा कार्यकाळ वाढवला असला तरीही, त्यांच्या कालावधीबाबत स्पष्टता नाही. त्याबद्दल शहा यांनी सांगितले, ‘आम्ही सर्वांचा कार्यकाळ वाढवला आहे. मात्र, कराराचा कालावधी किती असेल हे अद्याप ठरवलेले नाही. विश्वचषक स्पर्धेमुळे आम्हाला यासाठी वेळ मिळाला नाही. संघ दक्षिण आफ्रिकेवरुन परतल्यानंतर आम्ही याबाबत निर्णय घेऊ.’