शालेय वाहनांवर आरटीओची करडी नजर

पाच महिन्यांत 63 अवैध शालेय वाहनांवर कारवाई

| नवी मुंबई । वार्ताहर ।

खारघर येथे शालेय बस आगीच्या दुर्घटनेनंतर आता अवैध शालेय बस, वाहनांवर आरटीओची करडी नजर राहणार आहे. यामध्ये वाहनांची योग्यता आणि वाहन परवाना यांची कसून चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती वाशी आरटीओने दिली आहे. वाशी आरटीओकडून एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात 63 अवैध वाहनांवर कारवाई करून परवाना रद्द केला आहे. करोना काळात दोन वर्ष बंद असलेल्या शाळा या शैक्षणिक वर्षापासून ऑफलाइन सुरू झाल्याने विद्यार्थी ने आण करणार्‍या शालेय बसेस देखील सुरू झाल्या आहेत. मात्र यातील बर्‍याच बसेस, वाहने नियमांना बगल देत चालवल्या जात असल्याचे समोर येत आहे. खारघर येथील शालेय बसला लागलेल्या आगीचे घटनेने शालेय बसेसचा सुरक्षितेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी अवैध विनापरवाना, नोंदणी, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहून नेणे, वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, चालकाचा परवाना बॅच यांची तपासणी करणे, यामध्ये विशेषतः वाहन परवाना आणि वाहन योग्यता प्रमाण पत्र, अग्निशमन यंत्रणा यांची कटाक्षाने तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात आरटीओ 63 वाहनांवर कारवाई करून 85 हजार दंडात्मक वसुली केली आहे तसेच काहींचे परवाने रद्द केले आहेत.

आता शाळा सुरळीत झाल्या असून विद्यार्थ्यांना नेणार्‍या शालेय बस ही सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्या पासुन नियमांचे पालन न करणार्‍या शालेय वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. येत्या आठवड्यापासून पुन्हा खारघर येथील घटनेच्या अनुषंगाने पुन्हा परिवहन आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार या वाहनांची योग्यता प्रमाण पत्र आणि वाहन परवाना यावर करडी नजर ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.

हेमांगी पाटील,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,वाशी
Exit mobile version