अहमदनगर | प्रतिनिधी |
शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाला उच्च न्यायालयाने अवघ्या पाच दिवसांतच स्थगिती दिली आहे. विश्वस्त मंडळाशी संबंधित प्रकरण न्यायालयात सुरू असताना न्यायालयाला अवगत न करता नव्या मंडळाने सूत्रे कशी स्वीकारली? अशी विचारणा न्यायालयाने केली असून यावर 23 सप्टेंबरला म्हणने सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
दीर्घकाळ रखडलेल्या या विश्वस्त मंडळाची राज्य सरकारने 16 सप्टेंबरला नियुक्ती केली. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आमदार अशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे ड. जगदीश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जयंत जाधव, महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, अनुराधा आदिक, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, राहुल कनाल, सुहास आहेर व अविनाश दंडवते यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाच जागा अद्याप रिक्त आहेत.
नव्या विश्वस्त मंडळाने 17 सप्टेंबरला सूत्रेही स्वीकारली आहेत. मात्र, यासंबंधी न्यायालयात विविध याचिका दाखल झालेल्या आहेत. नवीन विश्वस्त मंडळ नियुक्ती आणि जुन्या कारभारासंबंधी उत्तमराव शेळके यांची एक याचिका दाखल आहे. यासोबतच राज्य सरकारने केलेल्या नियमातील दुरूस्तीला आव्हान देणारी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांचीही याचिका दाखल आहे. यातील शेळके यांच्या याचिकेची सुनावणी सुरू असताना न्यायालयाने राज्य सरकारला नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्याचा आदेश दिला होता. त्याला राज्य सरकारने अनेकदा मुदतवाढ घेतली होती. मधल्या काळात विश्वस्त मंडळातील सदस्यांच्या नावांची यादीही व्हायरल झाली होती. मात्र, प्रत्यक्ष नियुक्ती झाली नव्हती. अखेर यासाठी 20 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.