टेहळणी गड होतोय उध्वस्त, संवर्धनाच्या प्रतेक्षेत
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
सामराजगड हा किल्ला मुरुडच्या दक्षिण दिशेस असलेल्या एकदरा गावात असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून अंदाजे 80 मीटर आहे. मुरुड खाडीवरील पूल ओलांडून एकदरा गावात शिरल्यावर तेथून गावाच्या मागे असलेल्या सामराजगड इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. शिवरायांनी जंजिरा किल्ल्याच्या स्वारीवेळी टेहळणी गड म्हणून बांधला होता. परंतु, आज त्या गडाचा वापर खडक दर्शक दिवा म्यहणून होत आहे. गडाचे सर्व बुरुज नष्ट झालेत परंतु, या गडावरून जंजिरा किल्ला व पदामदुर्ग किल्ला अगदी जवळ दिसतो. स्वारी काळात लक्ष ठेवण्यासाठी गडाचा वापर होत असे. गडाच्या संवर्धाची गरज आहे.
मुरुड तालुक्यातील सामराजगड हा एक ऐतिहासिक मात्र, अपरिचित दुर्ग आहे. मुरुड-जंजिरा येथे आल्यावर पर्यटक जंजिरा व पद्मदुर्ग या जलदुर्गांना आवर्जून भेट देतात. मात्र, काही जणांचीच पावले सामराजगडाकडे वळतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे या गडाविषयी अनेकांना फारशी माहिती नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत दुर्गप्रेमींच्या जागरूकतेमुळे या अपरिचित किल्ल्याकडे पर्यटकांची पावले वळायला लागली आहेत. गडाच्या पायथ्याशी एक शिवमंदिर असून रस्त्यात एकदरा गावातील घरे दुतर्फा दिसून येतात.
गडावर तटबंदी व बुरुजांचे अवशेष आजही दिसून येतात. मात्र, काळाच्या ओघात त्यांचे अस्तित्व नष्ट होऊ लागले आहे. सामराजगडाचे महत्व हे त्याच्या उंचीमुळे नसून त्याचे स्थान आणि मराठ्यांचा प्रबळ शत्रू सिद्दी याची राजधानी असलेल्या जंजिरा या किल्ल्यावर वचक ठेवणे आणि राजपुरी खाडीवरील दळणवळणावर नियंत्रण ठेवण्यासाठी होते. किल्ल्यावरून जंजिरा, पद्मदुर्ग, मुरुड शहर, राजपुरी खाडी व अरबी समुद्र असा विस्तृत परिसर दृष्टिक्षेपात ठेवणे हा आहे. सामराज गडाच्या निर्मितीचा इतिहास फारसा उपलब्ध नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वाकांक्षी जंजिरा मोहिमांमध्ये हा किल्ला बांधण्यात आला असावा. अनेकांच्या मते सामराजगडाचे बांधकाम हे 1661 साली जेव्हा शिवाजी महाराजांनी व्यंकोजीपंत यांना 5000 स्वार आणि 2000 मावळे देऊन राजपुरीवर पाठवले होते, तेव्हा झाले असे मानतात.