रुपाली केळसकर
भारतासाठी रेनवॉटर हॉर्वेस्टिंगचं तंत्रज्ञान नवीन नाही. या तंत्रज्ञानाची माहिती जगाला फार पूर्वीपासून आहे. पावसाळ्यात लाखो लिटर पाणी वाहून जाऊ द्यायचं आणि पुढचा काळ थेंबा-थेंबासाठी तरसायचं, ही आपली वृत्ती आहे. यासंबंधीचे सरकारचे फतवेही फाईलीतच पडून राहतात. जगातल्या अनेक देशांपेक्षा अधिक पाऊस पडूनही ‘पाण्यासाठी दाही दिशा, कशास फिरविशी जगदिशा’ असं म्हणण्याची वेळ का येते, हे तपासायला हवं.
मागचा पाऊसकाळ चांगला असूनही आणि बहुतांश धरणांमध्ये चांगला पाणीसाठा असूनही काही भागात मात्र पाण्यासाठी लोकांची वणवण सुरूच आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी स्थिती अनेक भागांमध्ये पहायला मिळते. आत्ताही हंडाभर पाण्यासाठी काही किलोमीटरची पायपिट करणार्या महिलांचे फोटो वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध होताना दिसत आहेत. पाण्याचा टँकर आल्यानंतर घागरभर पाण्यासाठी जीवघेणी धावपळ करणारे आबालवृद्ध आपण पहात आहोत. पाण्याचं दुर्भिक्ष्य असणार्या भागांमध्ये तळ गाठलेलं पाणी काढण्यासाठी लोकांची जीवघेणी धडपड बघायला मिळत आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरांमधल्या काही सोसायट्यांमध्येही पाण्याची कमतरता, कमी दाबाने पाणी येणं, आठवड्यातले काही दिवसच पाणी येणं यासारखे तापदायक प्रकार बघायला मिळत आहे. त्यातून मार्ग काढत पाऊस येईपर्यंतचा काळ काढण्याचं आव्हान अनेकांपुढे उभं ठाकलं आहे. थोडक्यात सांगायचं तर, आपल्याकडे सामान्यातल्या सामान्य माणसांनी पाणीटंचाईवर आपापल्या पध्दतीने उपाय शोधले आहेत; परंतु त्यांच्या समस्यांची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही.
जगात पिण्याचं सर्वात शुद्ध पाणी कोणतं, या प्रश्नाचं उत्तरही पावसाचं पाणी हेच आहे. असं असताना आपल्याकडे किमान पाचशे तर जास्तीत जास्त तीन हजार मिलीमीटर पाऊस पडणारे विभाग आहेत. नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातल्या सांगवी भुसार इथल्या पंढरीनाथ मोरे यांनी आपल्या घराच्या छतावर पडलेलं पावसाचं पाणी व्यवस्थित गाळून नेऊन वर्षभर पिण्यासाठी वापरलं. यामुळे त्यांच्या घरातल्या सर्वांचे छोटे-मोठे आजार दूर झाले. संगमनेर तालुक्यातल्या नंदकुमार सुर्वे आणि अन्य काहींनीही पावसाचं पाणी वर्षभर साठवून पिण्यासाठी वापरलं. अनेक शेतकरी छतावर पडणार्या पावसाचा एक थेंबही वाया जाऊ देत नाहीत. पाणी अडवून त्याच भागात जिरवतात. काही वर्षांपूर्वी शासनानेही ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ योजना आखली. तिचं पुढे काय झालं, हे सरकारलाच माहीत. पण गावानं ठरवलं तर काय करता येऊ शकतं, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हिवरे बाजार. अनेकदा शंभर मिलीमीटरच्या आत पाऊस होऊनही या गावाला कधीच टँकरची गरज भासली नाही. त्याचं कारण पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब अडवून तिथेच जिरवायचं गावकर्यांचं धोरण आणि पावसाचं प्रमाण लक्षात घेऊन केलेलं पीकनियोजन! घराच्या गच्चीमध्ये तसंच पर्वतीय पाणलोटांमधून पाऊस गोळा करणं आणि भूगर्भातल्या जलाशय आणि तलावांमध्ये साठवण्याचं महत्त्व आपल्याला अनेक वर्षांपासून माहीत आहे. मग आपण हे तंत्रज्ञान का स्वीकारलं नाही? हे ज्ञान वापरण्यात आपण का आणि कुठे कमी पडलो, हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे.
यासंदर्भात राजस्थानमधलं उदाहरण तपासून पाहण्याजोगं आहे. इथली पाण्याची कुंडी पाहून आश्चर्य वाटतं. ही कुंडी अर्थात सॉसर्स पक्क्या जमिनीवर ठेवलेल्या उलट्या कपाच्या आकारातले होते. तिथले लोक जमीन चुना लावून झाकतात आणि इतका उतार देतात की पाणी बाहेर पडून मधोमध साठतं. मग पाऊस कितीही कमी का होईना, सर्व पाणी साचून विहिरीत जातं. प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी विहीर झाकून ठेवलेली असते. केवळ शंभर मिलीमीटर (मिमी) पावसात एक हेक्टर जमीन एक दशलक्ष लिटर पाणी साठवू शकते. हे प्रमाण निश्चितच कमी नाही. पाच सदस्यांच्या कुटुंबाला पिण्यासाठी एका दिवसात 10-15 लिटरपेक्षा जास्त पाणी लागत नाही. स्वयंपाक करण्यासाठी आवश्यक पाणी गृहीत धरलं तरी त्याचं प्रमाण फार जास्त नसतं. थोडक्यात, एका कुटुंबाला वर्षाला चार-पाच हजार लिटर पाणी लागतं. याचा अर्थ एका हेक्टरमध्ये 200-300 कुटुंबांच्या गरजा भागवण्याइतपत पाणी विहिरीत सहज साठू शकतं. चेरापुंजीमध्ये संपूर्ण जगात सर्वाधिक पाऊस पडतो. तिथे फिरताना एका छोट्याशा सरकारी गेस्ट हाऊसमध्ये एक मोठा संदेश दिसला- ‘पाणी अनमोल आहे, कृपया त्याचा जपून वापर करा…’ ज्या ठिकाणी 14 हजार मिलीमीटर पाऊस पडतो, तिथे पाण्याची कमतरता आहे. जैसलमेरमध्ये केवळ 50-100 मिलीमीटर पाऊस पडत असूनही ते एक समृद्ध, प्राचीन सभ्यता जपणारं आणि पिवळ्या वाळूच्या दगडाचा भव्य किल्ला असलेलं शहर आहे.
पाण्याची कमतरता असताना हे शहर कसं बांधलं गेलं असेल, या प्रश्नावरही इथेच उत्तर सापडलं. तिथे आधीपासूनच टेरेस असो वा तलाव, सर्वत्र पावसाचं पाणी साठवण्याची परिपूर्ण व्यवस्था होती. त्यामुळे भविष्याचं पाणी सुरक्षित करणं शक्य झालं. देशाच्या प्रत्येक प्रदेशाची पाण्याची साठवणूक आणि नंतर ते वापरण्याची स्वतःची खास योजना असते. प्रत्येक प्रणाली विशिष्ट प्रदेशाच्या पर्यावरणीय गरजांनुसार विकसित केली गेली. असं असूनही प्रत्येक प्रणाली ही एक अभियांत्रिकी चमत्कार होती. ती त्या प्रदेशाच्या पावसाच्या पाण्याच्या संचयनानुसार तयार केली गेली होती. मग हे तंत्रज्ञान का नाहीसं झालं? कालांतरानं सरकार पाणी पुरवठादार बनलं. पूर्वी हे नियंत्रण समाज किंवा घरांकडे होतं. याचा अर्थ रेनवॉटर हार्वेस्टिंगला आता प्राधान्य राहिलेलं नाही. दुसरं म्हणजे पावसाच्या पाण्याद्वारे पुनर्भरण होतं त्या स्थानिक भूजलाचा वापर आता भूपृष्ठावरील पाण्याला प्राधान्य देण्यासाठी होऊ लागला. अनेकदा हे पाणी दुरून कालव्याद्वारे आणलं जातं. त्यामुळेच ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ ही एक कल्पना बनली आहे. शासनाला पावसाचं पाणी साठवणं शक्य नाही. म्हणूनच यामध्ये सर्वसामान्यांचाही सहभाग आवश्यक आहे. प्रत्येक घर, वसाहत, गाव आणि पाणलोटात यासंबंधी जागृती निर्माण करणं आवश्यक आहे. आपण आपल्या गरजांसाठी भूजलावर अवलंबून असतो तेव्हाच असं करण्यास प्रोत्साहित केलं जातं. शहरं आणि गावांनाही पाईपने पाणी मिळालं तर पावसाचं पाणी कोण आणि का उचलणार?
दुसरी अडचण अशी आहे की आपण भूजल संचयनाची कला आणि त्यामागील विज्ञान पूर्णपणे समजून घेण्यात अपयशी ठरलो आहोत. त्यामुळे पाणलोट (ज्या जमिनीवर पावसाचं पाणी येतं) अतिक्रमण केलं जातं किंवा जमीन सुधारणेच्या नावाखाली वाटप केलं जातं. भूमिगत साठवणासाठी पावसाचं पाणी वाहून नेणारे नाले एक तर नष्ट झाले आहेत किंवा नवीन बांधण्यात आले आहेत. अशा स्थितीत रेनवॉटर हार्वेस्टिंग कसं शक्य होणार? त्यामुळेच दुष्काळ आणि पूर हे चक्र असंच सुरू राहून समस्या अधिक बिकट होणार आहे. एकीकडे माणसाला अजून स्वतःच्या पाण्याची सोय करता आलेली नाही. दुसरीकडे अंग भाजून काढणार्या उन्हात पाणी कुठे शोधायचं असा प्रश्न पशु-पक्ष्यांनाही पडतो. आता पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणवठे तयार करणारे हातही पुढे येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. माणूस कशी तरी पाण्याची व्यवस्था करतो; परंतु पशुपक्ष्यांचं काय, हा प्रश्न उरतो. शासन तरी कुठे कुठे पुरं पडणार, असं वाटत असताना काही ठिकाणी मात्र चांगलं चित्र पुढे येतं. इथे त्याचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. सामान्य माणूस कडक उन्हाने हैराण झाला आहे. त्याचबरोबर जनावरांनाही उन्हाचा त्रास होत आहे. कडाक्याच्या उन्हात पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी गाझियाबाद जिल्हा प्रशासनानं अनोखा उपक्रम सुरू केला. तहानलेल्या पक्ष्यांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ‘पाण्याची वाटी प्रकल्प’ सुरू करण्यात आला आहे. म्हणजेच लोक विकास भवनातून एक वाटी पाणी घर, दार, बाग इत्यादी ठिकाणी टांगू शकतात. ‘एक दाणा, पाण्याची एक वाटी पक्ष्यांसाठी’ असा अभिनव उपक्रमही काही वर्षांपूर्वी सुरू झाला होता. तीव्र उन्हाळ्यात झाडं जगवण्यासाठी सलाईनच्या बाटल्यांमधून झाडांना पाणी देण्याची व्यवस्थाही काही ठिकाणी केल्याचं अनुभवायला आलं.
या प्रकल्पांतर्गत गाझियाबादमध्ये लोकांना मोफत पाण्याची भांडी दिली जात आहेत. त्यामध्ये पाणी भरून घराच्या दारात किंवा छतावर ठेवू शकतात. हे पाणी पिऊन पक्षी आणि इतर प्राणी तहान भागवू शकतील.
जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पशुसंवर्धन विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे. कडाक्याच्या उन्हात जनावरं तहानेनं व्याकूळ होऊन जीव सोडतात. पर्यावरणातल्या सर्व सजीवांना एकत्र राहण्याचा अधिकार आहे. उन्हापासून जनावरांना वाचवण्यासाठी ही ‘बाउल योजना’ तयार करण्यात आली असून हे बाऊल लोकांना वाटण्यात येत आहे. यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार आहे. या मोहिमेत लोक समर्पित भावनेनं काम करत आहेत, ही निश्चितच समाधानकारक बाब म्हणावी लागेल.