| पुणे | प्रतिनिधी |
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन झाले. बुधवारी (दि.7) रात्री उशिरा पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते. पर्यावरण चळवळीचे आधारस्तंभ आणि पश्चिम घाटांच्या जैवविविधतेचे कट्टर रक्षक मानले जाणारे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारांदरम्यान बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी 4 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भारतातील पर्यावरणविषयक जाणिवा आणि विशेषत: पश्चिम घाटांमधील जैवविविधतेबाबतच्या संवेदना जिवंत ठेवणं आणि त्या प्रगल्भ करणं यासाठी डॉ. माधव गाडगीळ यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. पश्चिम घाटांमध्ये राबवल्या जाणाऱ्या विकासकामांमुळे घाटातील जीवसृष्टी आणि एकूण पर्यावरणीय समतोलासाठी मोठं संकट निर्माण होऊ शकतं, हा धोक्याचा इशारा सर्वप्रथम माधव गाडगीळ यांनीच प्रशासनाला दिला. पश्चिम घाटाच्या संरक्षण व संवर्धनासाठी डॉ. माधव गाडगीळ यांनी 2011 साली तयार केलेला गाडगीळ अहवाल म्हणजे विकासकामांसाठी पर्यावरणाला धक्का पोहोचवण्यासाठी कायम तयार असलेल्या मानसिकतेला ढळढळीत वास्तव दाखवणारा आरसा ठरला. डॉ. माधव गाडगीळ यांनी भारतातील पर्यावरणविषयक मुद्द्यांवर दिलेल्या योगदानाची दखल संयुक्त राष्ट्रांनीदेखील घेतली. गाडगीळ यांना 2024 सालच्या यूएनईपीचा ”चॅम्पियन ऑफ द अर्थ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ”सहा दशकांच्या वैज्ञानिक कारकिर्दीत डॉ. माधव गाडगीळ यांचा प्रवास हार्वर्ड विद्यापीठाच्या सभागृहांपासून ते भारत सरकारच्या उच्चपदापर्यंत झाला. पण या संपूर्ण प्रवासात माधव गाडगीळ यांनी स्वत:ला जनतेचा वैज्ञानिकच मानलं”, अशा शब्दांत UNEP च्या निवेदनात डॉ. माधव गाडगीळ यांचा गौरव करण्यात आला आहे.






