उपक्रमातून रस्ते, घरे, कागदपत्रे व सामाजिक योजनांचा नागरिकांना लाभ
। पाली/वाघोशी । प्रतिनिधी ।
शासनाच्या आदेशानुसार महसूल विभागामार्फत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर2025 या कालावधीत राबविण्यात आलेला ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात पार पडला. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जात असल्याने या उपक्रमाद्वारे सर्वसामान्य नागरिकांशी निगडित विविध महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात आले.
17 ते 22 सप्टेंबर दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात ‘पाणंद रस्ते विषयक मोहीम’ राबविण्यात आली. सुधागड तालुक्यात राबगाव, तिवरे, आतोणे व माणगाव खुर्द या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थ, महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी तसेच स्थानिक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांच्या सहभागातून शिवार फेरी काढण्यात आली. या मोहिमेत आधीपासून नकाशावर असलेले 3 रस्ते व नव्याने निश्चित झालेले 38 शेतरस्ते, पाणंद व वहिवाटीचे रस्ते नोंदविण्यात आले. एकूण 41 रस्त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देऊन ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली.
23 ते 27 सप्टेंबर दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ला पूरक उपक्रम राबविण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या अतिक्रमणधारकांना निवासी जमिनींचे पट्टे देण्याच्या दृष्टीने पाहणी व मोजणी करण्यात आली.
नगरपंचायत पाली क्षेत्रातील टेंभी वसाहतीतील 46 अतिक्रमणांपैकी 20 अतिक्रमणे पात्र आढळली. तर मौजे महागाव येथील गुरचरन जमिनीवरील 37 अतिक्रमणे पात्र ठरली. या अतिक्रमणधारकांना जमिनींचे पट्टे वाटप करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला असून लवकरच वाटपाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्थानिक गरजांनुसार नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.
जन्म नोंदणी दाखले वितरण : कातकरी व इतर वंचित घटकातील 48 विद्यार्थ्यांना जन्म आदेश देण्यात आले. यामुळे त्यांना आधारकार्ड व शैक्षणिक कागदपत्रे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
सामाजिक निवृत्तीवेतन योजनांची पडताळणी : तालुक्यातील एकूण 1,574 लाभार्थ्यांपैकी उर्वरित 276 लाभार्थ्यांची पडताळणी महसूल व मंडळ अधिकाऱ्यांनी घरी भेट देऊन पूर्ण केली.
माजी सैनिक भेटी : ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या उपक्रमांतर्गत महसूल अधिकार्यांनी माजी सैनिकांच्या घरी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आयुष्मान भारत कार्ड वाटप : तहसील कार्यालय व तालुका आरोग्य विभागाच्या संयुक्त उपक्रमातून विविध ठिकाणी शिबिरे घेऊन 428 नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आले. यामुळे प्रत्येकी कुटुंबाला वर्षाकाठी 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य विम्याचा लाभ मिळणार आहे.
या ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमाला सुधागड तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावनिहाय फेऱ्या, ग्रामसभांमधील मंजुरी, अतिक्रमणांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण, घराघरांत जाऊन पडताळणी, शिबिरे अशा माध्यमांतून अनेक कामे वेगाने मार्गी लागली.
तहसील कार्यालय, सुधागड-पाली यांच्या पुढाकारामुळे तालुक्यातील शेतकरी, अतिक्रमणधारक, विद्यार्थी, सामाजिक योजना लाभार्थी तसेच आरोग्य सुविधांपासून वंचित नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळाल्याने सेवा पंधरवडा हा उपक्रम केवळ औपचारिक न ठरता लोकाभिमुख ठरला, अशी सर्वत्र प्रशंसा होत आहे.
