पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील अपघातात सातजण जखमी

। पनवेल । वार्ताहर ।

पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर पनवेल येथील आदई गावाशेजारी रविवारी (दि.17) सायंकाळी प्रवासी बस आणि इरटीगा मोटारीत झालेल्या अपघातामध्ये सात प्रवासी जखमी झाले. बसथांबा नसताना सुद्धा प्रवासी वाहतूक करणारी बस येथे थांबविण्यात आल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी या प्रकरणी बसचालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हॉटेल येथून सुरू होतो. द्रुतगती महामार्गावर बसथांब्याची सोय नसल्याने द्रुतगती महामार्ग सुरू झाल्यापासून दोन किलोमीटर अंतरावर खांदेश्वर आणि नवीन पनवेल येथील प्रवाशांनी त्यांच्या सोयीसाठी आदई गावाजवळील पुल संपल्यावर लगेच बस थांबवून तेथे उतरतात. त्यामुळे आदई गावाजवळ द्रुतगती महामार्गावर बेकायदा बसथांबा बनला आहे. रविवारी सायंकाळी पूणे येथील मुंबईकडे जाणारी बस या बसच्या चालकाने प्रवाशांना उतरविण्यासाठी भरधाव वेगात असलेली बस आदई गावाजवळील पुल ओलांडल्यानंतर लगेच महामार्गालगत उभी केली. पाऊस सुरू असल्याने या बस अचानक थांबल्याने या बसच्या पाठीमागून येणा-या इरटीगा मोटार चालकाने मोटारीचा ब्रेक मारला. मात्र, पावसामुळे ब्रेक लागला नाही आणि मोटारीची मागून बसला धडक बसली. या अपघातामध्ये सातजण जखमी झाले. जखमींमध्ये दोन महिलांसह 11 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. नजीकच्या रुग्णालयात जखमींवर वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले.

Exit mobile version