। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड समुद्रकिनारी सुशोभीकरणाचे काम नगरपरिषदेच्यावतीने सुरू असून गटाराचे काम धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे पदाधिकारी नाराजी दर्शवली आहे. हे काम लवकरात लवकर करुन त्यावर ढापे बसवावे याकरिता पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाच्यावतीने मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
मुरूड समुद्रकिनारी ज्याठिकाणी टपरी लावल्या जातात त्याच ठिकाणी मोठे गटार बांधण्यात येत आहे. यामुळे येणार्या पर्यटकांना उभे किंवा बसण्याकरिता नाहक त्रास होत आहे. या गटाराचा उपयोग फक्त पावासाचे पाणी जाण्यासाठी बांधण्यात येत आहे. परंतु, येथील दुकानादार व अन्य लोकांकडून जर या ठिकाणी कचरा टाकण्यास सुरुवात केली तर या ठिकाणी दुर्गंधी होऊ शकते. याचा परिणाम येथील व्यवसायावर होऊ शकतो. तसेच, काम सुरू असलेल्या गटारात कोणीही पडून दुखापत होऊ शकते. तरी मुख्याधिकारी साहेबांनी याकडे लक्ष देऊन ठेकेदारांकडुन गटाराचे काम जलदगतीने करुन त्यावर ताबडतोब ढापे बसावावे. जेणेकरुन पर्यटक या ठिकाणी थांबले पाहिजेत. नाहीतर सर्व टपरीधारक आर्थिक संकटात सापडून उपासमारीची वेळ येऊ शकते. तरी मुख्याधिकार्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन अरविंद गायकर व पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केले आहे.