दिखावा न करता त्यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे

इंधन बचतीवरून शरद पवारांचा नेत्यांना टोला

| पुणे | प्रतिनिधी |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर नेत्यांकडून सुरू झालेल्या प्रतिकात्मक कृतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी टोला लगावला आहे. एक-दोन दिवस गाड्यांचा ताफा कमी करून किंवा पायी चालून काही साध्य होणार नाही. दिखावा न करता त्यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे, असा सल्ला शरद पवार यांनी नेत्यांना दिला.

देशातील सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगताना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची सर्वांनी गांभीर्याने दखल घ्यायला हवी. प्रशासनाच्या खर्चात बचत करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी सातत्यपूर्ण कृती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर काही मंत्री ताफे कमी करताना किंवा पायी चालताना दिसत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये. एक-दोन दिवसांच्या बचतीने काही होणार नाही. हे नेते किती दिवस सातत्य ठेवतात, हे महत्त्वाचे आहे.

मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या संख्येवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. 17-17 गाड्यांचे ताफे कशाला हवेत? त्या कमी करून सात-आठ गाड्यांवर आणल्या जात आहेत आणि त्याचाही गाजावाजा केला जातो. गेल्या चार वर्षांपासून माझ्या ताफ्यात फक्त तीन गाड्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयात दुचाकीवरून आल्याच्या घटनेवर बोलताना पवार म्हणाले, मुख्यमंत्री रोज बाईकवरून मंत्रालयात आले तर लोक त्याला गांभीर्याने घेतील. दरम्यान, नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर टीका केली. याआधीही अशा घटना घडल्या होत्या. आवश्यक ती खबरदारी घेतली नसल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम झाला आहे, असेही पवार म्हणाले.

Exit mobile version