तालुका चिटणीस विकास नाईक यांची ग्वाही
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील होऊ घातलेल्या विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनी संपादनाची प्रक्रिया सरकारने सुरु केलेली आहे. मात्र ती करताना प्रकल्पग्रस्तांवर अन्याय केला जात आहे. यासाठी या प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी शेकाप ठामपणे उभा राहणार आहे, अशी ग्वाही तालुका चिटणीस विकास नाईक यांनी दिली.
तालुक्यातील सारडे, पुनाडे, वशेणी, केळवणे आणि त्या जवळील गावांमध्ये एमआयडीसी येऊ घातली आहे. जमिनीला योग्य भाव. जमिनीचा प्रकल्पग्रस्तांना 22.5 टक्के परतावा, तरुणांना 100% नोकरभर्तीत स्थान, गावांच्या विकासासाठी सुविधा इत्यादी आणि अन्य बाबींबाबत तेथील प्रत्येक शेतकरी जागा झालेला आहे. याबद्दल नाईक यानी समाधान व्यक्त केले.
मात्र, प्रकल्प उभारताना सरकार वारेमाप आश्वासने देते. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल शेकापने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकर्यांना न्याय देताना नेहमी दिलेल्या आणि दिल्या जाणाऱ्या आश्वासनांकडे टाळाटाळ करत असते. याबाबत जाग्या झालेल्या जनतेसोबत त्या पट्ट्ययातील शेकापक्ष मोठ्या ताकदीने लढा देणार असून उरण पनवेलचा शेकापक्ष मोठ्या ताकदीने उभा राहिल्या शिवाय राहणार नाही असे विकास नाईक यांनी निक्षून सांगितले आहे. ज्या ज्या ठिकाणी शेतकर्यांवर अन्याय झाला आहे त्या त्या वेळी जिल्ह्यात शेकाप शेतकर्यांसोबत राहिला तसाच उरण पूर्व विभागासोबत राहणार आहे, असेही मत विकास नाईक यांनी आक्रमकपणे व्यक्त केले आहे.