शेतीची कामे खोळंबल्यामुळे मेंढपाळचा निवार्‍याचा प्रश्‍न

| पाताळगंगा । प्रतिनिधी |

दिवाळी सण सुरु झाला की, घाटमाथ्यावरील मेंढपाळ मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. दर वर्षी दिवाळी पूर्वी भात कापणी सुरु होत असते. मात्र या वर्षी परतीच्या पावसाच्या लपंडावामुळे शेतीची कामे खोळंबळी असून घाटमाथ्यावरुन येत असलेल्या मेंढपाळ आपला बिर्‍हाड घोड्यांच्या खांद्यावर टाकून कोकणाकडे प्रस्थान करण्यास सुरुवात झाली आहे. सोबत मुले आणी आपला संसार घोड्याच्या पाठीवर टाकून आपल्या कुटुंबातील सदस्य आणी मेंढ्याचे पोट भरण्यासाठी येत आहे. मात्र तुरळक ठिकाणी भात कापणी झाली असून मेंढ्या कुठे बसविणार हा एकच प्रश्‍न डोके वर काढत आहे.

भात कापणी झाली नसून माळरानावर आपला संसार थाटण्याची लगबग सुरु झाली आहे. मात्र या ठिकाणी सध्या मोठ्याप्रमाणावर गवत असून विविध सरपटणार्‍या सापांची भितीमुळे मेंढपाळ हवाळदिल झाला आहे. भात शेती कापली की शेतात मुबलक प्रमाणात जागा मिळत असते. यामुळे मेंढ्यांच्या निवारा समवेत अन्नांचा प्रश्‍न मार्गी लागत असतो. शिवाय भात कापणी झाल्यामुळे भात शेतीला येणारे गवत हा सकस आहर त्यांस मिळत असतो. मात्र ते चित्र सध्या दुर्मिळ झाले आहे.

शेकडो मैल अंतर कापून पाऊसाची चाहूल लागताच पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला जाणे हे अनेक वर्ष चाललेले समीकरण आहे. मात्र कोकणाकडे आपल्या जवळ असलेल्या मेंढ्या घेवून येताना जणू तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच भात कापणी झाली नसल्यामुळे मेंढ्यांना निवारा कुठे द्यायचा ह्या विचारांने मेंढपाळ चिंताग्रस्त झाले आहे. दोन दिवसात भात कापणी जरी सुरु केली तरी सुद्धा आठ ते दहा दिवस भात कापणीं पुर्ण होईल. मात्र तो पर्यंत मेंढ्या कुठे बसविणार चार्‍याचा प्रश्‍न जरी मार्गी लागत असला तरी सुद्धा निवारा मात्र वार्‍यावरच राहिला आहे.

Exit mobile version