रायगडच्या राजकारणात नवा ट्विस्ट; महायुतीतील वाद पुन्हा पेटला
| चणेरा | सत्यप्रसाद आडाव |
राज्यात आधीच राजकीय वातावरण तापलेलं असताना त्यात निवडणुका तोंडावर आहेत. अशातच महायुतीचे खा. सुनिल तटकरे व आ.महेंद्र दळवी यांनी आपापसातच स्पर्धा करायला सुरुवात केली आहे. आमदारांनी तटकरेंच्या बालेकिल्ल्यात दहिहंडीचे आयोजन केले असून, तटकरे नेमकी काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.
पालकमंत्री पदाच्या निवडीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. तटकरे व शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमधील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. अशातच तटकरेंचा बालेकिल्ला असलेल्या रोह्यात शिंदे गटाचे आ. दळवींनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या सणांपेक्षा राष्ट्रवादी पक्ष व शिंदे गटाचे राजकारण जास्त रंगू लागले आहे. यंदाच्या रोहा शहरातील दहीहंडी उत्सवाला राजकीय वळण मिळालं असून, शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तटकरे यांच्यातील न बोललेली रस्सीखेच लोकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. शिंदे गटाची दहीहंडी रोह्यातील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर उभारण्यात येणार आहे, तर राष्ट्रवादीची दहीहंडी कुंडलिकेच्या तीरावर उभारण्यात येणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून खा. तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात संगठित राजकीय डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. महाडमधून शिंदे गटाचे बलाढ्य नेते राजीव सांबळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला, तोही थेट शिंदे गटाचे आ. भरत गोगावले यांच्या मतदारसंघात. अलिबागमध्ये काँग्रेसचे नेते प्रविण ठाकूर यांना राष्ट्रवादीत सामील करून घेतलं तर कर्जतमध्ये आ. महेंद्र थोरवे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सुधाकर घारे यांना थेट राष्ट्रवादी रायगड जिल्हाध्यक्ष पदाची धुरा दिली. तसेच महाडमध्ये स्नेहल जगताप यांचा प्रवेशही राष्ट्रवादीत यापुर्वीच घेण्यात आला आहे.
दळवी हे थेट तटकरे यांना आव्हान देत नसले, तरी राजकीय थर उभारून सत्तेचा इशारा देत आहेत, अशी कुजबुज सध्या रोह्याच्या गल्लीबोळांपासून नाक्यांपर्यंत ऐकू येते. बालेकिल्ल्यात थेट शिरकाव कराल तर, तुमच्या बालेकिल्ल्यात आम्ही गोविंदा उभा करू, असा सूचक संदेश या माध्यमातून देण्यात आला असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.
राज्यात आणि देशात महायुतीची एकी दाखवली जात असली, तरी रायगड जिल्हा मात्र अपवाद ठरला आहे. पालकमंत्री पदावरून तटकरे विरुद्ध शिंदे गटात थेट वाद सर्वांनीच पाहिला आहे. या दोन्ही दहीहंडीमधून फक्त थर नाही, महायुतीतील रणनीती, वर्चस्व आणि ताकद मांडली जाणार आहे, अशी जोरदार चर्चा रायगड जिल्ह्यात सुरू आहे.





