। नेरळ । वार्ताहर ।
एक हजार वर्षापूर्वी शालिवाहन राजाने निर्माण केलेले विकटगडा वरील भगवान शंकराचे प्राचीन मंदिर श्रावण महिन्यात शिवभक्तांनी फुलून जात आहे. शिवाजी महाराज यांनी सूरत आणि कल्याणची लुट केल्यानंतर तो खजिना या विकटगडावर ठेवला होता.त्या अर्थाने वित्त म्हणून या भगवान शंकराचे नाव वित्तेश्वर असे पडले बोलले जाते.मात्र तासभर डोंगर चढ़उतार करावा लागत असल्याने देखिल असंख्य शिवभक्त वित्तेश्वराचे दर्शन घेण्यासाठी नित्यनेमाने येत असतात.
शके 1937 मध्ये सह्याद्रीच्या सुळकावर शिवमंदिर उभारले गेले. मुंबई ग्यझेटमध्ये नोंद असलेल्या या तीन शिवलिंग असलेल्या मंदिराची बांधणी शालिवाहन राजाने केली असल्याची नोंद असून एकाच ठिकाणी ब्रम्हा,विष्णू आणि महेश यांची रुपे तेथे मिळतात. या शिव मंदिराचे विशेष म्हणजे डोंगराच्या खोल दरीकडील बाजूला दगडामध्ये चार पाण्याची कुंड आहेत,त्या कुंडाच्यामध्ये हे मंदिर आहे. त्या कुंडावरील दगडावर अनेक चित्रे कोरली असून पाण्याने कधीही महादेवाला अभिषेक घालता येईल अशाप्रकारे अगदी जवळ जवळ ती कुंड आहेत. या भगवान शंकर मंदिराची माहिती 20 वर्षापासून परिसराला झाल्याचे बोलले आहे.स्वामी समर्थ यांचे बदलापुर येथील भक्त स्वामी सखा हे प्रथम या गडावर आले.
गडाची पाहणी करीत असतांना त्यांना नेरळ कडील बाजुस मातीमध्ये गाड़लेली मंदिरासारखी भासावी अशी कमान दिसली. त्यांनी नेरल-माथेरान मिनीट्रेनचे चालक असलेले राजाराम खड़े यांच्या मदतीने अन्य सहकारी यांना सोबत घेवुन खोदकाम सुरु केले. त्यावेळी तेथे शिवलिंग आणि कुंड सापडले. आजही ते मंदिर अर्धवट अवस्थेत उभे असून जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न शिवभक्त करीत आहेत. परंतु एकाच ठिकाणी तीन शिवलिंग असलेल्या या मंदिराची महती अपार आहेत. श्रावण महिन्यात शेकडो शिवभक्त तेथे दीड तासाची पायपीट करून दर्शन घेण्यासाठी पोहचतात.
शालिवाहन काळातील शिवमंदिर
![](https://krushival.in/grygrars/2023/02/NERAL-3-875x1024.jpg)