गडकिल्ले हा छत्रपतींचा वारसा; युवराज संभाजीराजे भोसले यांचे प्रतिपादन
| महाड | उदय सावंत |
छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेसाठी स्वराज्य स्थापन केले. अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका घेणे, हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते. सरकार अनेक ठिकाणी करोडो रुपये खर्च करीत असते. आमदार, खासदारही आपल्या मतदारसंघात हजारो कोटी रुपयांचा निधी आणतात. म्हणूनच छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ले संवर्धनासाठी सरकारने दोन हजार कोटी द्यावेत, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले. गडकिल्ले हा आपला खरा वारसा आहे, तो जतन झालाच पाहिजे, असेही ते म्हणाले. किल्ले रायगडावर 351 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा गुरुवारी (दि. 6) मोठ्या उत्साहात साजरा झाला.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभूतपूर्व सोहळ्याची क्षणचित्रे याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगड हजेरी लावली होती. शिवभक्तांच्या अलोट गर्दीत आणि शिवगर्जनेने अवघा रायगड यावेळी दुमदुमून गेला. बुधवारी दुपारी पाचाड येथील राजमात जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करून युवराज संभाजी छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती पायरी मार्गाने किल्ले रायगडवर रवाना झाले. महादरवाजा पूजन आण गडपूजन झाल्यानंतर युद्धकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी बुधवारी सायंकाळी रायगडचा परिसर भारावून गेला होता.गुरुवारी सकाळी युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते नगारखाना येथे ध्वजारोहण करून शिवराज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्याला प्रारंभ झाला. श्री शिवछत्रपतींच्या पालखीचे राजसदरेवर आगमन झाल्यानंतर राज्याभिषेक विधी सुरु करण्यात आले. युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उत्सवमूर्तीला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. तर, मेघडंबरीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीस युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या हस्ते सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला.

यावेळी किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती. यामुळे किल्ले रायगडचा पायरी मार्ग, रायगड रोप वे शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. देशभरातून आलेल्या शिवभक्तांच्या तोंडून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ हा एकच नारा दिला जात असल्याने संपूर्ण रायगडची पायवाट आणि रोप-वे परिसर दुमदुमून गेला. जिकडे तिकडे हातात घेतलेल्या भगव्या पताका, फेटे बांधलेले शिवभक्त दिसून येत होते. पहाटेच या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. गडावर वाजणारे ढोलताशे, हलगीवर खेळले जाणारे मर्दानी खेळ, गोंधळ, शाहिरी पोवाड्यांनी संपूर्ण आसमंत निनादून गेला. शाहिरांच्या या पोवाड्यांना उपस्थित शिवभक्तांनीदेखील उठून दाद दिली. यामुळे गडावर शिवकाल अवतरल्याचा भास निर्माण होत होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि कर्तृत्व जगभरात पोहोचण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्याला तमाम शिवभक्तांच्यावतीने आपल्याला निमंत्रित करण्यात आल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी दिली. यावेळेस इंग्रज हेन्रीची वेशभूषा करुन एक आपला शिवभक्त आज आला आहे. त्यांनी त्याच वेशभूषेत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केला, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की, पुढील वर्षी इंग्लंडचा राजदूत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी किल्ले रायगडवर आणला जाईल, अशी ग्वाही छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी दिली.
यावेळी याठिकाणी युवराज संभाजी राजे यांच्यासह खा. ओमराजे निंबाळकर, आ. रोहित पवार, आ. मंगेश चव्हाण, आ. अनिकेत तटकरे, मनोज जरांगे पाटील, आ. प्रभाकर देशमुख, आ. बच्चू कडू, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, श्रीमंत कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने प्रशासनाने लाखो शिवभक्तांच्या सोयी सुविधांसाठी जय्यत तयारी केली होती. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने अन्नछत्राची व्यवस्था करण्यात आली होती. किल्ले रायगड तसेच रायगडाचा पायरी मार्ग आणि पाचाड येथे आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय सुविधा उभी करण्यात आली होती. यामध्ये जवळपास तीन हजारांहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले. पाचाड येथे तीसहून अधिक रुग्णवाहिका उपलब्ध केल्या गेल्या होत्या, अशी माहिती डॉ. भाग्यरेखा पाटील आणि डॉ. संध्या रजपूत यांनी दिली.
ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पद्स्पर्श झाला आहे, त्या भूमीत त्यांचा वंशज म्हणून काम करताना अभिमान वाटतो. मी आज जो कोणी आहे, तो केवळ या छ. शिवरायांमुळे आणि या रायगडामुळे आहे. सरकार अनेक ठिकाणी करोडो रुपये खर्च करीत असते. आमदार, खासदारही आपल्या मतदारसंघात हजारो कोटी रुपये आणतात. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ले संवर्धनासाठी दोन हजार कोटी सरकारने द्यावेत
छत्रपती युवराज संभाजीराजे