| नेरळ | प्रतिनिधी ।
नेरळ पोलीस ठाणे कोल्हारे ग्रामपंचायत मधील साई मंदिर परिसरातील चाळीत तरुणाने आपली पत्नी काही न सांगता घरातून तीन दिवस बाहेर गेली. या रागातून तिच्या चारित्र्यावर संशय घेत त्या तरुणाने आपल्या पत्नीचा गळा कापून हत्या केली. त्यानंतर त्या तरुणाने स्वतः गळफास घेत आपले जीवन संपविले.
कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हारे ग्रामपंचायत मधील साई मंदिर येथील मोहिते चाळ येथे पिंटू राम हे उत्तर भारतीय जोडपे आपल्या दोन लहान मुलांसोबत भाड्याने खोली घेवून राहत होते.आज शनिवार (दि.1) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पूजा पिंटू राम आणि पिंटू राम या दाम्पत्य यांच्यात जोरात भांडण सुरू झाले. त्यावेळी नवरा बायको यांच्यात झालेल्या झटापटीत पिंटू राम यांच्या शरीरावर लोखंडी कात्रीचे टोक लागले, त्यावेळी पिंटू राम याने आपली पत्नी पूजाच्या गळ्यावर धारदार सुऱ्याने वार केल्याने पत्नी पूजा ही रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली .आपली पत्नी मृत झाल्याचे पाहून पिंटू राम याने देखील त्याच ठिकाणी घरात गळफास घेत आपले जीवन संपविले आहे.
हा सर्व प्रकार घरात घडत असताना पूजा आणि पिंटूची लहान मुले हे झोपेतून उठून डोळ्यासमोर आईचा खून होत असताना आणि आपल वडील मरणाला जवळ करीत असताना पाहत होती. ही घटना 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरत एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून माहिती मिळताच घटनास्थळी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत पवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे, महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक हे सर्व घटनास्थळी पोहचले. तर काही वेळातच कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे पोहचले आणि तपासाची सूत्रे हाती घेतली.