पनवेलमध्ये विद्यापीठाच्या वास्तुचे भूमिपूजन
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी सोमवारी (दि.27) पनवेल येथे केले. कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचा भूमिमपूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत, मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, आ. रवींद्र पाटील, प्रधान सचिव मनीषा वर्मा, कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, आयुक्त डॉ.एन रामास्वामी, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे हे मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना बैस यांनी भारतामध्ये जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या आहे. तरीही भारतीय उद्योजक कुशल मनुष्यबळाच्या तीव्र कमतरतेचा सामना करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
श्रम ब्युरोच्या 2014 च्या अहवालानुसार रोजगार क्षमतेसाठी आवश्यक कौशल्याच्या अभावामुळे भारतातील औपचारिकपणे कुशल कर्मचार्यांचा सध्याचा आकार केवळ 2 टक्के आहे. याशिवाय पारंपारिक शिक्षण घेतलेल्या तरुणांच्या मोठ्या वर्गाला रोजगार देण्याचे आव्हानही आपल्या सर्वांच्या समोर आहेत.
रमेश बैस, राज्यपाल
सुरवातीला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, राज्य गीत आणि विद्यापीठ गीत गायले गेले. प्रास्ताविक कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी केले.







